स्मार्ट मीटरचा ‘शॉक’ - बिल भरूनही ३० तास उद्योग अंधारात

स्मार्ट मीटरचा ‘शॉक’
- बिल भरूनही ३० तास उद्योग अंधारात
Published on

वीज तोडण्यात ‘स्मार्ट’, जोडण्यात सुस्त!
ठाण्यात कारखान्याला झटका; बिल भरूनही ३० तास अंधारात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : वीजबिल थकले म्हणून स्मार्ट मीटरने एका उद्योगाचा वीजपुरवठा क्षणार्धात खंडित केला. यानंतर बिलाची रक्कम भरल्यावर तोच वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तब्बल ३० तास लागल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघड झाला आहे. तलवार कम्पाउंड येथील एका कारखान्याला महावितरणच्या या कारभाराचा मोठा फटका बसला असून, वीजपुरवठा बंद असल्याने तब्बल ८१० मनुष्य तासांचे कामकाज ठप्प झाला आहे, असा दावा ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने केला आहे. या प्रकारामुळे स्मार्ट मीटरशी संबंधित यंत्रणेवर उद्योग क्षेत्रातून सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.

उद्योगाच्या वीजबिलाची देय तारीख उलटून अवघे चार दिवस झाले होते. त्यानंतर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर संबंधित उद्योगाच्या व्यवस्थापनाने विलंब न करता एनईएफटीद्वारे बिलाची रक्कम भरली; मात्र वीजपुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे ग्राहकाने महावितरणच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला. स्थानिक कार्यालयाकडेही पाठपुरावा करण्यात आला. त्यातूनही काही निष्पन्न न झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी उद्योगाने ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनकडे धाव घेतली. असोसिएशनने ठाणे परिमंडळातील कार्यकारी अभियंता आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला. त्यानंतर सकाळपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, तरीही वीजपुरवठा सुरू झाला नाही. अखेर प्रकरण ठाणे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच अधीक्षक अभियंता यांच्या स्तरावर नेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरू करण्यात आला. यादरम्यान ३० तास उद्याेगाचे कामकाज ठप्प हाेते. त्यामुळे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज तोडण्याची प्रक्रिया काही क्षणांत होत असेल, तर ग्राहकाने देयक भरल्यानंतर वीजजोडणी तितक्याच वेगाने का होत नाही, असा प्रश्न असोसिएशनने केला आहे.

असोसिएशनचे सरचिटणीस भावेश मारू यांनी या प्रकाराबाबत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी त्याची स्वयंचलित जोडणी-विच्छेदन प्रणाली, पेमेंट अपडेट होण्याची प्रक्रिया आणि तक्रार निवारण यंत्रणा सक्षम आहे का, याबाबतची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. वीज तोडण्याची यंत्रणा स्मार्ट, पण जोडणीची व्यवस्था सुस्त असेल तर अशा स्मार्ट मीटरचा उद्योगांना फायदा काय, असा सवाल करून समाधानकारक स्पष्टीकरण मिळेपर्यंत उद्योगांसाठी स्मार्ट मीटरच्या वापराला पाठिंबा देणार नसल्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे. वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी ग्राहकाला पूर्वसूचना देण्यात आली होती का, स्मार्ट मीटर नेमक्या कोणत्या प्रणालीच्या आधारे वीज तोडते, बिल भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ३० तासांचा विलंब का झाला, या प्रश्नांची उत्तरे महावितरणने द्यावीत, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.
............................
पैसे भरले तर पुन्हा पैसे कशासाठी?
ग्राहकाला महावितरणच्या मोबाईल ॲपवरून पुन्हा वीजबिल भरण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोपही असोसिएशनने केला आहे. संबंधित ग्राहकाने एनईएफटीद्वारे आधीच बिलाची रक्कम भरलेली असताना पुन्हा पैसे भरण्याची वेळ का यावी, असा सवाल ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे सरचिटणीस भावेश मारू यांनी उपस्थित केला आहे. उत्पादनात खंड पडल्याने आर्थिक नुकसान तर झालेच; शिवाय ग्राहकांना माल पुरविण्याचे वेळापत्रकही कोलमडल्याचे मारू यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com