फुकट धान्य नको, कमाईने जगण्याचा हक्क हवा! अन्न, शिक्षणाच्या प्रश्नावर विवेक पंडित यांचा सरकारला सवाल

फुकट धान्य नको, कमाईने जगण्याचा हक्क हवा!
अन्न, शिक्षणाच्या प्रश्नावर विवेक पंडित यांचा सरकारला सवाल
Published on

फुकट धान्य नको, कमाईने जगण्याचा हक्क हवा!
अन्न, शिक्षणाच्या प्रश्नावर विवेक पंडित यांचा सरकारला सवाल

वज्रेश्वरी, ता. ६ (बातमीदार) : ‘‘सरकारच्या योजना केवळ कागदावर असून, त्याचा फायदा ठेकेदारांनाच होत आहे. देशातील ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य दिल्याचे कौतुक सांगितले जाते; मात्र स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही गरिबांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आपल्या मुलांना फुकटच्या धान्यावर नव्हे, तर स्वतःच्या कमाईवर जगता आले पाहिजे,’’ अशी खंत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केली.

श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी ग्रामीण तालुक्यातील रेणुका विद्यालय (झिडके) येथे आयोजित संविधान हक्क मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यादरम्यान मुसळधार पावसातही पंडित यांनी नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रेशन धान्यवाटपातील गैरप्रकारावर बोलताना पंडित म्हणाले, ‘‘प्रत्येक लाभार्थ्याला ३५ किलो धान्य मिळाले पाहिजे. एक किलो धान्य कमी दिले तरी रेशन दुकानदारासोबतच संबंधित पुरवठा निरीक्षकावरही कारवाई झाली पाहिजे.’’
ठाणे व पालघर जिल्ह्यातील हजारो कातकरी आणि आदिवासी नागरिकांकडे जन्मदाखले नसल्याने त्यांना विविध ओळखपत्रे मिळण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘जन्मदाखल्यासाठी न्यायालयात जाण्याची अट अन्यायकारक असून, तहसीलदारांना पूर्वीप्रमाणे जन्मदाखले देण्याचे अधिकार द्यावेत,’’ अशी मागणी त्यांनी केली. आश्रमशाळांमध्ये गेल्या दोन वर्षांत ५८४ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करीत त्यांनी ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरावर केजी ते पीजीपर्यंतची निवासी विद्यासंकुले उभारण्याची मागणीही त्यांनी केली.

श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांनीही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ‘‘‘हर घर नल से जल’च्या घोषणा केल्या जात असल्या तरी गावात पाइप टाकूनही पाणीपुरवठा झालेला नाही. नळाला पाणी आले नाही; मात्र गरिबांच्या डोळ्यांत अश्रू आले,’’ अशी टीका त्यांनी केली. अनेक ज्येष्ठ नागरिकांना अद्याप ओळखपत्रे व रेशन कार्ड मिळाले नसल्याचे, तसेच वनहक्क दावे व शासकीय योजनांच्या फायली तहसील आणि प्रांत कार्यालयात प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.
वनजमिनींचे पट्टे, स्वतंत्र सातबारा, गावठाणांच्या जागा आणि मूलभूत हक्कांसाठी आता गप्प न बसता कुटुंबीयांसह मुंबईकडे मोर्चा काढण्याचा इशारा पंडित आणि घाटाळ यांनी दिला.
मेळाव्यास भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोले, सहाय्यक गटविकास अधिकारी सुदाम इंगळे, कार्याध्यक्ष बाळाराम भोईर, सरचिटणीस विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, महिलाप्रमुख रेखा पऱ्हाड, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष व भिवंडी ग्रामीण अध्यक्ष सागर देसक, तालुका सचिव विश्वनाथ पासारी, आशा भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com