

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना ठाणे महापालिकेने विसर्जन घाटांवरील तयारीला वेग दिला आहे. ढोल-ताशांचा गजर, बाप्पाच्या जयघोषात होणाऱ्या विसर्जन मिरवणुका आणि लाखोंच्या संख्येने घाटांवर जमणाऱ्या भाविकांची गर्दी, हे चित्र डोळ्यांसमोर ठेवून महापालिकेने तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. गर्दीच्या काळात सुरक्षेची कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शहरातील प्रमुख विसर्जन घाटांची पाहणी करून प्रशासनाला १३ सप्टेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
गणेशमूर्तींचे विसर्जन दीड दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत होत असल्याने घाटांवर भाविकांची वर्दळ राहणार आहे. त्यामुळे भाविकांना सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय विसर्जन करता यावे, यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर महापालिकेने भर दिला आहे. महापौरांनी मासुंदा तलावातील दत्त घाट, रायलादेवी येथील कृत्रिम तलाव आणि गायमुख विसर्जन घाटाची पाहणी केली. यापूर्वी कोपरी, कोलशेत आणि पारसिक येथील घाटांचाही आढावा घेण्यात आला. घाटांवरील स्वच्छता, विद्युत व्यवस्था, सुरक्षितता, पिण्याचे पाणी, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांसाठीच्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेण्यात आला.
विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन तलावांच्या परिसरात संरक्षक कठडे उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. कृत्रिम तलावांची तयारी, पुरेशी विद्युत व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याबरोबरच सुरक्षा रक्षकांची संख्या अधिक ठेवण्याचे निर्देश दिले. भाविकांच्या सोयीसाठी आरतीची स्वतंत्र व्यवस्था, पावसापासून संरक्षणासाठी आच्छादित जागा, फिरती स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, निर्माल्य संकलन केंद्रे, ध्वनिक्षेपक आणि माहितीफलक उभारण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
.............................
दत्त घाटाचे पाणी बदलणार
मासुंदा तलावातील दत्त घाटावर मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे विसर्जनाच्या ठिकाणचे पाणी बदलण्याबरोबरच घाटाच्या परिसराची रंगरंगोटी करून तो सुशोभित करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. शहरातील मोठ्या गृहसंकुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे अशा गृहसंकुलांची संख्या लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी स्वतंत्र विसर्जन टाक्या उपलब्ध करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
...........................
गायमुखवर वाहतुकीची कसोटी
गायमुख विसर्जन घाटावर विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून नियोजन करण्याचे आदेश दिले. दरम्यान, महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी गणेशमूर्ती स्वीकार केंद्रेही उभारली आहेत. भाविकांनी या केंद्रांचा वापर करून पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
............................
अनंत चतुर्दशीच्या दिवशी घाटांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुका शक्य तितक्या लवकर काढाव्यात. महापालिका, पोलिस आणि वाहतूक विभागाच्या सूचनांचे पालन करून विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.
- शर्मिला पिंपळोलकर, महापौर, ठामपा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.