

वृद्धेला मिळाला सहा दिवसांत न्याय
ई-प्रणालीतील झटपट निकालाची पहिली घटना
ठाणे शहर, ता. १२ (बातमीदार) ः अपघातग्रस्त वृद्धेला जलद गतीने न्याय मिळाल्याची घटना ठाणे मोटार अपघात न्यायालयात घडली. जखमी वृद्धेला अवघ्या सहा दिवसांत ६.२० लाखांची भरपाई देण्याचे आदेश ठाणे सत्र न्यायालयात भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये देण्यात आले. एवढ्या गतीने न्याय मिळण्याचा आणि ई-प्रणालीतील हा पहिलाच निकाल आहे. जलद न्याय मिळालेल्या पीडित वृद्धेचे नाव रेखा अहुजा असून, एका चारचाकी वाहनाच्या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. बेलापूर न्यायालयाने एका अपघात प्रकरणात २.४० कोटी आणि ठाणे न्यायलयात दोन कोटींची भरपाई देण्याचा निकाल दिला.
ठाणे आणि पालघर जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी (ता. १२) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत झाली. यात विविध प्रलंबित आणि दावा पूर्व प्रकरणांचा आपसात तडजोड करून निकाल लागला. केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने पेपरलेस आणि झटपट निकाल लागण्याकरिता ई-प्रणाली निकाल पद्धती सुरू केली आहे. याचा पहिला निकाल ठाणे सत्र न्यायालयात भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत लागला. मुंबईतील खार परिसरात मोटार अपघातात जखमी झालेल्या रेखा अहुजा (वय ७६) यांना ६,४०,००० रुपयांची भरपाई देण्यात आली. वकील सुहासिनी नावडकर यांनी ई-प्रणालीनुसार ७ सप्टेंबरला ऑनलाइन दावा दाखल केला असता, त्यावर अवघ्या सहा दिवसांत (१२ सप्टेंबर) निकाल लागला.
मोटार अपघातात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकांचा २२ डिसेंबर २०२१मध्ये नेरूळ उड्डाणपुलाजवळ घडलेल्या अपघातात मृत्यू झाला होता. हे प्रकरण बेलापूर न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश प्रसन्ना चंदगुडे यांच्या पॅनेलसमोर निकालासाठी आले. विमा कंपनी आणि पक्षकारामध्ये दोन कोटी ४० लाखांची तडजोड झाली. तसेच ठाणे जिल्हा न्यायालयात अमित गायकवाड नामक मृताच्या वारसांना दोन कोटींची भरपाई देण्यात आली. या व्यक्तीचा पुण्यातील मुळशी येथे अपघाती मृत्यू झाला होता. सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या गायकवाड यांना तीन लाख रुपये महिना पगार होता. यासोबतच आणखी एका निकालात मृत कमरुद्दीन मोल्ला यांच्या वारसाला ८९ लाख रुपयांची भरपाई मिळाली. २०२४ मध्ये झालेल्या मोटर अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे वार्षिक उत्पन्न ९,८७,००० होते. या प्रकरणात वकील कुणाल हजारे यांनी पीडितांची बाजू मांडली. आणखी एका प्रकरणात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वैभव कथारे यांच्या वारसाला ८० लाखांची भरपाई देण्याचे आदेश दिले. या दाव्यात वकील एस. टी. कदम यांनी बाजू मांडली. ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रवींद्र पाजनकर यांच्या नेतृत्वाखाली ही लोकअदालत झाली. पीडितांच्या वारसांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्या हस्ते भरपाईचे धनादेश देण्यात आले.
-----------
ठाणे ः अमित गायकवाड यांच्या वारसाला मुख्य न्यायाधीशांच्या हस्ते दोन कोटींचा धनादेश देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.