

गणरायाच्या आगमनाने मुंबई भक्तिमय
आकर्षक देखावे, विद्युत रोषणाईने मंडप उजळले; सामाजिक संदेशालाही प्राधान्य
प्रभादेवी, ता. १५ (बातमीदार) ः गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात झाली असून, गणरायाच्या आगमनाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आकर्षक सजावट आणि विविध देखावे साकारण्यात आल्याने नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.
गणेशमूर्तींच्या आगमनापासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. अनेक मंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक विषयांवर आधारित देखावे उभारले आहेत. पर्यावरण संवर्धन, यांसारख्या विषयांवर साकारलेले देखावे विशेष आकर्षण ठरत आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, पारंपरिक कलाकुसर तसेच पर्यावरणपूरक सजावटीवर भर देण्यात आला आहे. काही मंडळांनी आकर्षक प्रतिकृती आणि भव्य देखावे उभारल्याने रात्रीच्या वेळी परिसर उजळून निघत आहे. या देखाव्यांना भेट देण्यासाठी लहान मुलांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची मोठी गर्दी होत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, आरोग्य शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, गणेशभक्तांकडून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात उत्सवाचा आनंद घेतला जात असून, संपूर्ण परिसर भक्ती आणि उत्साहाने भारावून गेला आहे. त्यामुळे भक्ती, कला आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम साधणारा गणेशोत्सव मुंबईत रंगला आहे.
मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश
मुंबईतील अनेक मंडळांनी धार्मिक देखाव्यांसोबत सामाजिक आणि जनजागृतीपर विषयांना प्राधान्य दिले आहे. पर्यावरण संवर्धन, महिला सुरक्षा, शिक्षण, व्यसनमुक्ती, सामाजिक एकोपा, भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा यांसारख्या विषयांवर आधारित देखावे साकारण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मंडळांकडून केला जात आहे.
भाविकांची गर्दी
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील प्रमुख सार्वजनिक मंडळांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने मंडळांकडूनही गर्दीचे नियोजन, सुरक्षा आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे. दीड दिवसांच्या गणरायाचे मंगळवारी विसर्जन झाल्यानंतर मंडपांमध्ये गर्दीसाठी भाविकांची गर्दी वाढेल, अशी माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.