प्रति मूर्तीसह ९०० ग्रॅम निर्माल्य!

प्रति मूर्तीसह ९०० ग्रॅम निर्माल्य!
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : भक्तिभावाने गणरायाची पूजा-अर्चा करून विसर्जन केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या निर्माल्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्नही त्याच वेळी समोर येतो. ठाणे महापालिकेने दीड दिवसाच्या विसर्जनानंतर २० हजार ७०३ मूर्तींचे विसर्जन आणि १८ हजार ६०० किलो निर्माल्य संकलित केल्याची माहिती दिली आहे. या आकडेवारीनुसार प्रति गणराय सरासरी सुमारे ९०० ग्रॅम निर्माल्य येत असल्याचे पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी निदर्शनास आणले आहे. या निरीक्षणातून निर्माल्याचे प्रत्यक्ष प्रमाण, त्याचे वजन आणि पुढील प्रक्रियेबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार दीड दिवसाच्या २० हजार ७०३ मूर्तींचे विसर्जन झाले, तर त्याच वेळी १८ हजार ६०० किलो निर्माल्य महापालिका क्षेत्रामध्ये संकलित झाले. याचे प्रमाण पाहता प्रत्येक मूर्तीसोबत सरासरी ९०० ग्रॅम निर्माल्य संकलित झाल्याचे दिसते, मात्र हा आकडा नेमका कसा मोजण्यात आला, याची माहिती सार्वजनिक झाली नसल्याकडे कट्टी यांनी लक्ष वेधले आहे. संकलन करणाऱ्या वाहनांचे वजन करण्यात आले होते का, नोंदविण्यात आलेले वजन निर्माल्याचे निव्वळ वजन आहे की त्यात पाणी, पिशव्या आणि अन्य मिश्रित कचऱ्याचाही समावेश आहे, असे प्रश्न कट्टी यांनी उपस्थित केले आहेत.

दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर आता पाच आणि सात दिवसांच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत मोठ्या प्रमाणावर विसर्जन होणार असल्याने निर्माल्याचे प्रमाणही वाढणार आहे. त्यामुळे पुढील दिवसांच्या व्यवस्थापनासाठीही महत्त्वाची ठरणार आहे. कट्टी यांनी महापालिकेच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे, मात्र या आकडेवारीमागची संपूर्ण माहिती नागरिकांसमोर यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

६२१ किलो प्लॅस्टिकचा मुद्दा
महापालिकेने संकलित निर्माल्यात साधारण तीन टक्के प्लॅस्टिक पिशव्यांचे प्रमाण असल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात ६२१ किलो प्लॅस्टिक वेगळे झाले असल्यास ते एकूण १८ हजार ६०० किलो निर्माल्याच्या सुमारे ३.३४ टक्के ठरते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक निर्माल्यासोबत आले कसे, असा प्रश्नही कट्टी यांनी उपस्थित केला आहे. माझ्यासोबत आलेल्या प्लॅस्टिकचा आकडा खरा असेल, तर पुढील वर्षी निर्माल्य संकलनाबरोबर प्लॅस्टिकमुक्त पूजेबाबत जनजागृती करण्यासाठीही तो महत्त्वाचा ठरू शकतो, असे कट्टी यांनी सांगितले.

निर्माल्य आले कुठून?
१८ हजार ६०० किलो निर्माल्य हा संपूर्ण महापालिका क्षेत्रातील सर्व विसर्जनस्थळांचा एकत्रित आकडा आहे की काही निवडक संकलन केंद्रांवरील निर्माल्याचा, याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे. किती संकलन केंद्रे उभारण्यात आली होती, प्रत्येक केंद्रावर किती निर्माल्य जमा झाले आणि कोणत्या ठिकाणी किती निर्माल्य संकलित झाले, याची स्थाननिहाय आकडेवारी उपलब्ध झाल्यास या आकड्याचे वास्तविक प्रमाण अधिक स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

संकलनापुढे काय?
निर्माल्यातील प्लॅस्टिक वेगळे करून ते एमआरएफ केंद्रात पाठविण्यात येत असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. त्याचप्रमाणे हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्क आणि कौसा येथील मेकॅनिकल बायो-कंपोस्टिंग प्रकल्पांमध्ये निर्माल्यावर प्रक्रिया होत असल्याचे सांगण्यात आले आहे. संकलनापासून वर्गीकरण, प्लॅस्टिक विलगीकरण, एमआरएफ केंद्र, कंपोस्टिंग आणि अंतिम उत्पादनापर्यंतची माहिती सार्वजनिक झाल्यास निर्माल्य व्यवस्थापनाची कार्यक्षमता अधिक स्पष्ट होईल.

Marathi News Esakal
www.esakal.com