धुक्याच्या आड रात्री ‘रसायनां’चा खेळ?

धुक्याच्या आड रात्री ‘रसायनां’चा खेळ?
Published on

उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : पावसानंतरचे धुके, रात्रीचा अंधार अन् नागरिक गाढ झोपेत असलेल्या संधीचा फायदा घेत अंबरनाथच्या अतिरिक्त एमआयडीसीतील काही रासायनिक कंपन्यांकडून प्रक्रिया न करताच कथित केमिकल गॅस हवेत सोडला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. उग्र वास आणि धुक्यासदृश चादरीमुळे उल्हासनगरच्या सीमावर्ती परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रात्रीच्या अंधारात पावसामुळे निर्माण झालेल्या धुक्याचा फायदा घेत अंबरनाथ पश्चिमेतील एमपी गेटजवळील अतिरिक्त एमआयडीसीमधील काही रासायनिक कंपन्यांकडून कथित रासायनिक गॅस हवेत सोडला जात असल्याचा दावा ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी केला आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार घडत असून, त्यानंतर उल्हासनगर पूर्वेतील पॅनल क्रमांक १८ मधील भारतनगर, सुभाष टेकडी आणि दहा चाळ परिसरात धुक्यासदृश चादर पसरून उग्र वास जाणवत असल्याचा त्यांचा दावा आहे. नागरिक झोपल्यानंतर हा प्रकार होत असल्याने त्याकडे सहज लक्ष जात नसल्याचेही चंदनशिव यांनी म्हटले आहे. या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ई-मेलद्वारे त्यांनी तक्रार केली आहे. तक्रारीसोबत संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रेही पाठवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने तक्रारीची दखल घेत ती पुढील कार्यवाहीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाकडे पाठवल्याचे चंदनशिव यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com