
Sardesai Vs Deshpande: "चिल्लर लोकांवर बोलणार नाही"; देशपांडेंच्या आरोपांवर वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया
मुंबई : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंगवॉक दरम्यान काही लोकांनी हल्ला केला होता. यानंतर देशपांडे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून एफआयआर देखील दाखल झाला आहे. या एफआयआरमध्ये त्यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि सचिव वरुण सरदेसाई यांचा उल्लेख केला आहे. यानंतर आता सरदेसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Varun Sardesai reacts to MNS leader Sandip Deshpande allegations regarding attack on him)
संदीप देशपांडे यांनी एफआयआरबाबत पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, "माझं सविस्तर म्हणणं मी एफआयआरमध्ये मांडलं आहे. मला जे वाटतं ते मी पोलिसांना सांगितलं आहे, पोलीस त्या गोष्टीचा तपास करत आहेत. मला जे मारणारे होते त्यांच्या तोंडून मला जे ऐकू आलं ते मी पोलिसांना सांगितलं आहे. आज ते या ठिकाणी बोलणं योग्य ठरणार नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे, आरोपींची अटक होऊन त्यांची चौकशी होऊ द्या, त्यानंतर मी यावर सविस्तर बोलेन"
देशपांडे यांच्या या विधानानंतर त्यावर वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरदेसाई यांनी म्हटलं की, या देशात प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कोण काय बोलतं? आणि एखादा व्यक्ती बोलल्यानंतर तो व्यक्ती काही इतका मोठा नाही की आम्ही लगेच त्यावर रिअॅक्ट करावं. त्यामुळं अशा चिल्लर लोकांवर फारकाही बोलण्याची मला गरज वाटत नाही. स्वतःच्या प्रसिद्धी करता किंवा सिक्युरिटी मिळवण्याकरता त्यांनी हे केलं असेल हा त्यांचा त्यांचा विषय आहे. पण आम्हाला स्वारस्य आमचा पक्ष वाढवण्यात आहे, संघटना वाढवण्यात आहे.