Water Scarcity : पेण तालुक्‍यात धरणांनी गाठला तळ; खारेपाटात पाणीटंचाईच्या झळा

खारेपाटात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून प्रखर उन्हामुळे नैसर्गिक स्रोत कोरडे पडले
water scarcity vashi kharepat pen public demand water supply tanker
water scarcity vashi kharepat pen public demand water supply tankeresakal

पेण : खारेपाटात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून प्रखर उन्हामुळे नैसर्गिक स्रोत कोरडे पडले आहेत. तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेल्‍या धरणांनीही तळ गाठला आहे.

तालुक्यात एकीकडे पाणी टंचाई असतानाच दुसरीकडे धरणात पाणीसाठा वापराविना असल्‍याचे पाहायला मिळते. हेटवणे, शहापाडा आणि आंबेघर अशी तीन धरणे तालुक्‍यात आहेत. यात मध्यम प्रकल्प कामार्ली अखत्यारीत असणाऱ्या सर्वात मोठ्या हेटवणे धरण याची क्षमता १४७.४९८ द.ल.घ.मी. एवढी आहे. ती आता ५४ द.ल.घ.मी.वर पोहोचली आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारीतील शहापाडा धरणाची क्षमता ३२.५० द.ल.घ.मी. एवढी आहे, त्‍याची पातळी सध्या ८ द. ल.घ.मी. वर पोहोचली आहे. तर कर्जत पाटबंधारे उपविभागाच्या अखत्यारीतील आंबेघर धरणाची क्षमता २.५५ द.ल.घ.मी. एवढी आहे. सध्या या धरणात मुबलक पाणीसाठा आहे, मात्र नियोजनाअभावी पिण्याच्या पाण्यासाठी त्‍याचा उपयोग होऊ शकत नाही.

तालुक्यातील हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईसाठी वापरले जाते तर काही शहापाडा धरणात सोडून खारेपाटातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु शहापाडा धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्‍याने धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. धरणातील गाळ काढण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

पाणीटंचाई निवारणासाठी १.२४ कोटींचा आराखडा

पेण : खारेपाटातील महिलांना वर्षोनुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्‍यात गेल्‍या चार दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्‍याने अंगाची लाही लाही होत आहे. खारेपाटातील वाशी, वढाव, शिर्की, दिव, मसद, बोर्झे, कणे यासह इतर गावांमध्ये तर पूर्व विभागातील खरोशी, कोयना, राजदांड या भागातील गावांसह वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

पेण पंचायत समितीच्या माध्यमातून टँकरसाठी या वर्षीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात विंधन विहीर दुरुस्तीसह शहापाडा येथील पाईपलाईन दुरुस्ती याकरिता एक कोटी २४ लाखांचा प्रस्‍ताव आहे. १४ टँकरने परिसरात पाणीपुरवठा सुरू आहे. आराखड्यानुसार, प्रत्येक गावात चार दिवसांतून टँकरची एक फेरी दिली जात आहे.

सरकारने गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार ही योजना शहापाडा धरणासाठी राबवावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. ही योजना राबविल्यास धरणातील गाळ काढला जाईल. तसेच तो आजूबाजूच्या शेतात पसरवल्यास कृषी उत्‍पादनातही भरीव वाढ होईल. सध्या शहापाडा धरणात पुढील पंधरा ते वीस दिवस पुरेल इतका साठा राहिला आहे. हेटवणे धरणाच्या माध्यमातून आलेले पाणी पंपाद्वारे उचलत आहोत. पिण्याच्या पाण्याबाबत पुढील नियोजन चालू आहे.

- संजय राठोड, अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

खारेपाटातील पाणीपुरवठ्यासाठी सरकारने कोट्यवधींचा निधी दिला आहे, मात्र तरीही पाणीटंचाई दूर झालेली नाही. जलवाहिनी वारंवार फुटते.

- राजेंद्र झेमसे, सामाजिक कार्यकर्ते, वाशी

वाशी, शिर्की विभागासह पूर्व विभागातील एक-दोन गावांकरिता टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु उर्णोली गावाची लोकसंख्या जास्त असल्‍याने दररोज टँकर पाठवलाा जातो.

- संजय कांबळे, अधिकारी, पाणीपुरवठा पंचायत समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com