बॉलिवूड अभिनेते अक्षयकुमार आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता सौम्य भूमिका घेतली आहे. आधी या दोघांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर आता "आम्ही गोडसेवाले नाही तर गांधीवाले आहोत," अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.
पटोले म्हणाले, "मी अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात बोललो नव्हतो तर त्यांच्या कामाबाबत बोललो होतो. ते खरे हिरो नाहीत. त्यांनी जनतेच्या त्रासाबद्दल भाष्य करणं अपेक्षित होतं. मात्र, त्यांना फक्त 'कागदी वाघ' बनून रहायचं असेल तर माझी हरकत नाही"
या दोन कलाकारांना विरोध करताना पटोले पुढे म्हणाले, "आम्ही आमचं पाऊल मागे घेणार नाही पण जेव्हा जेव्हा त्यांचे चित्रपट प्रदर्शित होतील किंवा ते स्वतः आम्हाला दिसतील आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू. आम्ही त्यांच्याविरोधात संविधानिक मार्गानं आंदोलन करु कारण आम्ही गोडसेवाले नाही तर गांधीवाले आहोत."
दरम्यान, मनमोहन सिंग सरकारच्या काळात ट्विटरच्या माध्यमातून कायम सरकारवर टीका करणारे अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन आता डिझेल, पेट्रोल आणि गॅसची दरवाढ होत असताना गप्प का आहेत? असा सवाल केला होता. तसेच या दोन्ही कलाकारांचे सिनेमे आणि शुटिंग महाराष्ट्रात बंद पाडू असा इशाराही पटोले यांनी दिला होता. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.