
सायरस मिस्त्रींच्या मृत्यूला कोणत्या गोष्टी कारणीभूत? शवविच्छेदन अहवाल आला समोर
मुंबई : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं नुकतचं अपघाती निधन झालं. मुंबई-अहमदाबाद हायवेवर कारचं नियंत्रण सुटल्यानं त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पण अपघातानंतर नेमक्या कुठल्या गोष्टीमुळं त्यांचा मृत्यू झाला, याचं कारण शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. पीटीआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (What causes the death of Cyrus Mistry the autopsy report came out)
काय सांगतोय शवविच्छेदन अहवाल?
सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात म्हटलंय की, अपघातावेळी मिस्त्री यांच्यासह त्यांचा सहप्रवाशी जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. कारचा अतिवेग आणि चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाला. अपघातावेळी मिस्त्री आणि त्यांच्या सहप्रवाशानं सीटबेल्ट लावला नव्हता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. अपघातात मिस्त्री यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळं त्यांचं ब्रेनहॅमरेज झालं. त्याचबरोबर डोकं, मान, छाती आणि मांडीच्या हाडांमध्ये अनेक फ्रॅक्चर्स झाली. त्यामुळेच त्यांचा जागीच मृ्त्यू झाला. मुंबईच्या जेजे रुग्णालयात हे शवविच्छेदन पार पडलं. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.
नेमका कसा झाला होता अपघात?
अहमदाबादहून मुंबईकडे येताना चारोटी नाक्याजवळ सूर्या नदीवरील पुलाच्या कठड्याला मिस्त्री यांची कार जोरदार धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यामुळं मिस्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ब्रेन हॅमरेज होऊन अतिरक्तस्त्राव झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिस्त्री यांच्या निधनामुळं उद्योगविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.