ठाणे रेल्वे पुलाची दुरुस्ती कधी होणार?

ठाणे : पादचारी पूल बंद असल्याने अन्य पुलावर झालेली गर्दी.
ठाणे : पादचारी पूल बंद असल्याने अन्य पुलावर झालेली गर्दी.

ठाणे : जुने पादचारी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने अनेक रेल्वे स्थानकातील धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. परंतु महिनोंमहिने या पुलांच्या दुरुस्तीचे काम रखडल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. डोंबिवलीतील पादचारी पुलाच्या दुरुस्तीविषयी नागरिकांनी समाज माध्यमावर उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने या पुलाच्या कामास नुकताच सुरुवात झाली. परंतु ठाणे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी गेले नऊ महिने बंद असून, रेल्वे प्रशासन नेमकी कसली पहात आहे का असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.

रेल्वे प्रशासनाकडून सध्या सर्व पादचारी पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून धोकादायक पूल बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेच्या अखत्यारितील धोकादायक पुलांसोबतच रेल्वेच्या हद्दीत असणाऱ्या महापालिका आस्थापनांच्या धोकादायक पुलांचेही ऑडिट करून ते बंद करण्यात येत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल दुरुस्तीसाठी २४ फेब्रुवारीला रेल्वे प्रशासनाने बंद केला. नऊ महिन्यांचा कालावधी उलटला तरी पूल बंदच आहे.

ठाणे स्थानकातील फलाट क्र. दोन, तीन व चारला जोडणारा हा पादचारी पूल बंद असल्याने मधल्या पुलावर प्रवाशांची प्रचंड कोंडी होत आहे. दिवसभर हे कोंडीचे चित्र कायम असते. या पुलाचे दोन टप्प्यात काम पूर्ण केले जाणार असून पहिल्या टप्प्याच्या कामासाठीच प्रशासन एवढा विलंब करत असल्याने पूर्ण पुलाचे काम होण्यासाठी किती वर्षे लागतील, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सात लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रवाशांसाठी स्थानकात पाच पादचारी पूल आहेत. दोन जुने पादचारी पूल व पालिका प्रशासनाचे दोन छोटे पूलही प्रवाशांसाठी उपयुक्त आहेत. परंतु जुन्या पादचारी पुलांतील कल्याण दिशेकडील पादचारी पूल फेब्रुवारी महिन्यात दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला. या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्‍यता रेल्वे प्रशासनाने मे महिन्यात वर्तविली होती. मात्र, आता नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी अद्याप पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच आता ठाणे महापालिकेने मुंबई आणि कल्याण दिशेकडे उभारलेले दोन पादचारी पूल रेल्वेने आयआयटीच्या अहवालानंतर पाडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उर्वरित पुलांवर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. 

गेले अनेक महिने जुना पूल बंद आहे. यामुळे मधल्या पुलावर प्रचंड गर्दी असते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे पोलिस तैनात असतात. परंतु त्यांची संख्या पुरेशी नाही. प्रवाशांचा त्रास लक्षात घेता प्रशासनाने पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. 
- तनुजा भानुशाली, प्रवासी

पूल धोकादायक झाल्याने बंद करण्यात येतात हे मान्य. परंतु दुरुस्तीच्या नावाखाली महिनोन्‌ महिने, वर्षानुवर्षे पूल बंद असतात. टप्प्या टप्प्याने कामे हाती घेऊन ती प्रशासनाने पूर्ण करावी. पूल बंद केल्यानंतर इतर पुलावर होणारी कोंडी लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.
- प्रथमेश वाघ, प्रवासी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com