सरकारी घोळात अडकले पीककर्ज वाटप

file photo
file photo

नांदेड : कोरोनाच्या संकटात शासनाची कर्जमाफी अडकल्याने खरीप पिककर्ज वाटप रखडले आहे. शासनाने येणे समजून थकीत खातेदारांना पिककर्ज वाटप करण्याचे निर्देश बॅंकांना दिले. असे असलेतरी बॅंकां मात्र सरकारच्या ठोस निर्णयाविना ‘वेट ॲंड वॉच’ची भुमिका घेतली आहे. या बॅंकांना सरकारकडून पक्की हमी आल्याशिवाय कर्जवाटप अशक्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. 

दोन हजार ३१ कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी दोन हजार ३१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने विविध बॅंकांच्या शाखांना दिले आहे. जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले आहे. आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी दोन हजार ३१ कोटी, तर रब्बीसाठी ५०७ कोटी, असे एकूण दोन हजार ५३९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २८ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे. 

वेळेत कर्ज देण्याची सूचना
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती. परंतु, यंदा शेतकऱ्यांची पीककर्ज माफी कोरोना विषाणूच्या उपाययोजनेत लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये अडकल्याने पीककर्ज वाटपाचे काम ठप्प आहे. पीककर्ज माफीसाठी पात्र ठरलेल्या खात्यांवर कर्जमाफीची रक्कम वर्ग झाल्यानंतर त्या खात्याला नव्याने कर्ज वापट करणे सोयीचे होईल, अशा विचारात असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी चालू बाकीदार तसेच नव्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप सुरु केले असलेतरी शासनाच्या स्पष्ट निर्देशाअभावी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना मात्र अद्याप कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांचे १.२४ टक्के कर्ज वाटप 
जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत १.२४ टक्क्यानुसार केवळ दिड हजार खातेदारांना १९ कोटी ३६ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. तर जिल्हा बॅंकेने २३ हजार ५३६ सभासदांना ६१ टक्क्यांनुसार ११३ कोटी ४८ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. तर  ग्रामीण बॅंकने २ टक्क्यानुसार ७२९ सभासदांना पाच कोटी ७७ लाखांचे पीककर्ज वाटप केले. आजपर्यंत उदिष्टांच्या ६.८२ टक्क्यानुसार १३८ कोटी ६१ लाखांचे पिककर्ज वाटप झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून देण्यात आली.

पेरणीच्या काळात शेतकरी अडचणीत
जून महिना सुरु झाल्यामुळे पावसाचे आगमणही झाले आहे. अशा काळात शेतकऱ्यांना बियाणे तसेच खत खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्‍यकता असते. अशा महत्वाच्या काळता शासनाची कर्जमाफी तसेच कर्ज वाटपाचे काम रखडल्याने शेतकरी अडचणीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खताची अद्याप खरेदी केली नाही. काहींनी संयुक्त खतांएवजी कमी किमतीत मिळणाऱ्या युरीयाची खरेदी करण्यावर भर दिला आहे. यामुळे सध्या बाजारात युरीची मागणी वाढली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com