नांदेड : मागील वर्षी कपाशी पिकावर आलेल्या बोंडअळीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर घाव घातल्यानंतर यावर्षी तरी कापसाचे उत्पादन(Cotton production) चांगले होईल, ही आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, यंदाही बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कापूस(Cotton) उत्पादक शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे.
यावर्षी सुरुवातीला झालेला अति पावसामुळे कापूस (Cotton) उत्पादनात घट झाली असतानाच आता पुन्हा सलग दुसऱ्या वर्षीही बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले आहे. बोंडअळी येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी केली असली, तरी मात्र बोंडअळी थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे कापसाचे भाव वाढले असले, तरी धरी मात्र कापूस नाही. त्यामुळे कापसाच्या भाववाढीचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नसल्याचेच चित्र दिसून येत आहे.
यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. एवढेच नाही तर हा पाऊस लांबला होता. त्यामुळे कापूस पिकाचा हंगाम अद्यापही सुरुच आहे. लांबलेल्या हंगामामुळे बोंड अळीला अखंडित अन्नपुरवठा हा सुरुच आहे. त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव हा वाढतच आहे.
कृषी तज्ज्ञ सांगतात
बोंडअळीमुळे कापसाचे तर नुकसान होत आहेच. शिवाय शेतजमिनीवरही याचा परिणाम होतो आहे. आगामी हंगामातील पीक उगवण तसेच पीक वाढीवरही या बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेली पिके शेतातून काढून बांधावर टाकणे गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फरदडमुळी कपाशीच्या दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरीत वाणांची लागवड होते. या वाणांवर गुलाबी बोंड अळीच्या जास्त पिढ्.या पुर्ण होतात. परिणामी या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत अन्न पुरवठा होत असल्याने व जीवनक्रम एकमेकांत मिसळल्याने त्यांच्या संख्येत वाढ होते.
"माझ्याकडे एकूण बारा एकर शेती आहे. त्यापैकी मी सहा एकरवर कपाशी लावली आहे. यावर्षी कपाशीवर मोठ्या प्रमाणावर बोंडअळी आली आहे. त्यामुळे आता ही कपाशी शेतातून उपटून टाकायचा विचार सुरु आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भरपूर फवारणी केली. पण काहीच उपयोग झाला नाही. मागील वर्षी बोंड अळीची कल्पना नव्हती. परंतु, यावर्षी काही प्रमाणात कल्पना असल्याने खर्च केला. परंतु, त्याचं काहीच फलीत झालं नाही. मागील वर्षीच्या नुकसानभरपाईचे पैसे जमा झाले नसून यावर्षीही नुकसान झाले आहे."
- वामनराव गोराडे, शेतकरी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.