Video - नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

File photo
File photo

नांदेड : मान्सूनचा पेरणी योग्य पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणीनंतर पाच ते सहा दिवसांत मोड दिसायला पाहिजे. परंतु, पेरणी करूनही दहा-पंधरा दिवस झाले तरी, बियाणांची उगवण झालीच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मान्सूनचा पेरणीसाठी पहिलाच पाऊस योग्य पडल्याने शेतीची मशागत करून पेरणीसाठी अगोदरच उसनवारी करून काढलेल्या पैशांनी कृषी दुकानदारांकडून चांगल्या नामांकित असलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या बॅगची खरेदी केली. मोठ्या आशेने शेतात सोयाबीन पेरले. पेरणी केल्यावर पाच ते सहा दिवसांत मोड दिसायला पाहिजे. परंतु, अनेक शेतकऱ्यांची पेरणी करून दहा ते पंधरा दिवस होऊनही शेतातील सोयाबीन बियाण्यांची उगवनच झाली नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे वास्तव जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

शेतकरी अडचणीत
मागील काही दिवसांत शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आदी पिकांची हजारो हेक्टरवर पेरणी केली. अनेकांच्या शेतात बोगस बियाणांमुळे सोयाबीनची उगवणच झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारा खर्च द्यावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांसह सामाजिक, राजकिय संघटनांकडून समोर येत आहे. 

कष्टाने खरेदी केले होते बी-बियाणे
चार ते पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळेवर पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट'कोसळले होते. सतत पाच वर्षांच्या दुष्काळानंतर यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पेरण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून मोठ्या कष्टाने बी-बियाणे, खते खरेदी करून पेरण्या केल्या होत्या. एक बॅग सोयाबीन पेरण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च केले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

उराशी बाळगलेले स्वप्न भंगले
शासनाच्या उदासीन धोरणाचा सामना करीत काळ्या आईच्या भरवश्‍यावर हिंमतीने चार वर्षांपासून अडचणीतून सावरत या हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने यावेळी तरी चांगलं पीक येईल, चार पैसे खिशात पडतील, हे स्वप्न उराशी बाळगून मोठ्या हिमतीने पेरणीचा खर्च शेतकऱ्यांनी केला. हा खर्च वाया गेल्याने उराशी बाळगलेले स्वप्न भंगल्याने शेतकरी हतबल झाला असून दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना शासनाने आर्थित मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी पांडुरंग खरात, कैलास सोनवणे, राजेश पावडे आदींनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com