दिवाळी विशेष : धर्माबादेत १७ हजार कार्डधारकांची दिवाळी गोड

download.jpg
download.jpg


धर्माबाद, (जि. नांदेड) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिकाधारकांना दिवाळीसाठी नोव्हेंबर महिन्यासाठी प्रतिकुटुंब एक किलो साखर वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. त्याचा लाभ धर्माबाद तालुक्यातील १७ हजार ६३९ कार्डधारकांना होणार आहे. कार्डधारकांना अनुदानित दरात २० रुपये प्रती किलोने सदर साखरेचे वाटप करण्यात येईल. त्यामुळे प्राधान्य व एपीएल कार्डधारक शेतकऱ्यांची यावेळची दिवाळी गोड होणार आहे.


साखरेच्या वाटपावर शासनाचे नियंत्रण 
केंद्र शासनाने फेब्रुवारी २००१ पासून फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना साखरेचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना नियंत्रित साखरेचे वितरण करण्यात येत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना अधिक साखर मिळावी याकरिता सुरवातीला प्रतिमानसी ४२५ ग्रॅमऐवजी ५०० ग्रॅम परिमाण ठरविण्यात आले होते. त्यासह सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्याच्या नियंत्रित साखरेचा किरकोळ विक्रीचा दर केंद्र शासनाने १ मार्च २००२ रोजी १३ रुपये ५० पैसे प्रतिकिलो केला होता. परंतु नंतरच्या काळात साखरेच्या वाटपावर शासनाने नियंत्रण आणले. 

प्रतिमाह साखरेचे एक किलो वाटप 
त्याअंतर्गत प्रतिमानसी ऐवजी प्रतिकार्ड साखरेचे वाटप करण्यात आले. त्यासह साखरेच्या परिणाम सुद्धा प्रतिकार्ड एक किलो निश्चित केले. त्यामुळे सध्याच्या स्थितीत तालुक्यात अंत्योदय गटातील कार्डधारकांनाच प्रतिमाह साखरेचे एक किलो वाटप करण्यात येत होते. शासनाने प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिकाधारकांना एपीएल (शेतकरी कुटुंब) दिवाळीसाठी नोव्हेंबर महिन्यांसाठी प्रतिकुटुंब एक किलो साखर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ प्राधान्य कुटुंबातील १० हजार ५७५ कार्डधारक, शेतकरी कुटुंबातील ४ हजार ४३४ कार्डधारक तर अंत्योदय २ हजार ६३० कार्डधारक अशा १७ हजार ६३९ कार्डधारकांना होईल. प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असल्याचे नायब तहसीलदार शंकर हंदेश्वर यांनी सांगितले आहे.

लाभ कार्डधारकांनी घेण्याचे आवाहन 
प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिकाधारकांना (शेतकरी) दिवाळीसाठी नोव्हेंबर महिन्यांसाठी प्रतिकुटुंब एक किलो साखर वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, शेतकरी कुटुंबातील कार्डधारकांना वाटप करण्यात येत आहे. तरी याचा लाभ कार्डधारकांनी घेण्याचे आवाहन तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे.

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com