या भाजीच्या उत्पन्नापासून मिळू शकतात भरपूर पैसे; शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग

ghogari
ghogari

घोगरी (नांदेड) : नाव्हा (ता. हदगाव) येथील एका शेतकऱ्याने परंपरागत शेतीला बगल देत, आधुनिक शेतीची कास धरली असून, माळरानातील दुर्मिळ असणारी ‘सूरज कंद’ या नैसर्गिक वनभाजीची तब्बल चार एकर शेतीवर लागवड करून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे. या परिसरात कुठेही ही भाजी शेती नसल्याने बाजारात या वनभाजीला मोठी मागणी आहे.

येथील शेतकरी अमृता मोतीराम नावेकर यांना भाजीपाला शेतीची पूर्वीपासूनच आवड असल्याने त्यांनी पावसाळ्यात माळरानात कुठेतरी निघणारी दुर्मिळ अशी ‘सूरज कंद’ शेती करण्याचे ठरविले. सुरवातीला त्यांना नातेवाइकांकरवी आवडीने खाण्यासाठी म्हणून चार ते पाच किलो गड्डे मिळाले. याच गड्डेपासून त्यांनी ‘सूरज कंद बेणे’ वाढवण्याचा निश्चय केला. एक एकर बेणे तयार करण्यासाठी त्यांना चार वर्षांचा अवधी लागला.

मागील काही वर्षांपासून या परिसरात निसर्गाचा प्रकोप होण्याने, सदर शेतकऱ्यांनी केळीची लागवड बंद केली. हळद पीक घेऊन त्यात आंतरपीक म्हणून सूरज कंद घेणे पसंत केले. त्यातून त्यांना चार लाखांची मिळकत मिळाली. इतर पिकांच्या मानाने कमी पाण्यावर येणारे पीक व अत्यल्प खर्च त्यात बऱ्यापैकी उत्पन्न होऊ लागल्याने आनंदलेल्या बळीराजाने प्रतिवर्षी लागवडीचे क्षेत्र वाढवत आजघडीला चार एकर शेतीत ही भाजी शेती फुलवली आहे.

सूरज कंद ही कंदवर्गीय व माळरानातील दुर्मिळ समजली जाणारी नैसर्गिक वनभाजी असल्याने या परिसरात बहुधा श्री. नावेकरकडेच ही शेती आढळून येते. कमी खर्चात भरपूर उत्पन्न मिळणारी वनभाजी असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा कल ही भाजी शेती लागवड करण्याकडे असूनही त्यांना ‘सूरज कंद बेणे’ मिळत नसल्याने इच्छा असूनही त्यांचा हिरमोड झालेला पाहावयास मिळतो आहे; परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात सर्वत्र टाळेबंदी होण्यामुळे, सदर शेतकऱ्याची गतवर्षीची जवळपास दोन एकर शेतीमधील सूरज कंद अजूनही जमिनीतच असून, हे पीक परिपक्व होण्यासाठी जवळपास १७ महिन्यांचा अवधी लागतो.

जितके दिवस हे पीक जमिनीत राहील तेवढेच जास्तीचे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे या पिकापासून हमखास उत्पन्नाची हमी आहे; परंतु कोरोना परिस्थितीमुळे जास्तीच्या दिवस टाळेबंदी राहिल्यास नुकसान होण्याची भीती वाढल्याने केवळ ओळंबा (मुंग्या) पासून यास जास्तीचा धोका असल्याने ते यावर्षी पासून बेणे विक्री प्रक्रिया सुरू करणार आहेत. यातून त्यांना जवळपास सात लाख मिळकतीचे अनुमान आहे. हे पीक संपूर्णपणे नैसर्गिक असल्याने, खते, औषधी वापराविना जोमदार पीक येत असल्याने केवळ मनुष्यबळाची याकामी आवश्यकता आहे.

पीक काढणीच्या वेळीच खर्चिक बाब आहे. अन्यथा, या भाजी शेतीचा खर्च नगण्य आहे. यामुळे ही शेती परवडणारी आहे. शिवाय पाण्यावर येणारे पीक असल्याने या परिसरात अधिक क्षेत्रावर याचा विस्तार होण्यासाठी, शासनाच्या योग्य पाठबळाची आवश्यकता आहे. असे झाल्यास अनेक शेतकरी या लागवडीसाठी पुढे येऊन या भाजी शेतीची जनजागृती होऊन सूरज कंद खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढण्यास मदत होईल. यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होण्यास मदत होईल.

माधव धुमाळे म्हणाले, सूरज कंद भाजी शेती या परिसरात आधुनिक शेती असून, उत्सुकतेपोटी विविध भागांतून ही शेती पाहण्यासाठी शेतकरी या ठिकाणी आलेले दिसतात. विविध धार्मिक कार्याच्या ठिकाणी देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांस महाप्रसाद म्हणून सूरज कंद भाजी आवडीने केली जाते. या भाजीचा रुचकर आस्वाद घेण्यासाठी भक्तगण दूरवरून येतात. अशी ही बहुगुणी वनभाजी आहे; परंतु प्रसिद्धीविना मागे राहिली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com