अबब...! तब्बल सात वर्षांपूर्वी कोटेशन भरुनही शेतकऱ्याला मिळेना वीज; मात्र पाठविले ३४ हजाराचे बील 

file photo
file photo

फुलवळ ( जिल्हा नांदेड ) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याने सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला असून अशा प्रकारांना नेमके जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत असून वीज ग्राहक व शेतकऱ्यांनी न्याय मागवा तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कंधार तालुक्यातील जंगमवाडी येथील रहिवासी असलेले अल्पभूधारक शेतकरी पिराजी नागोराव झंपलवाड यांच्या नावे फुलवळ शिवारात शेती गट क्र. ७९ मध्ये ०.६० आर ( गुंठे ) एवढी जमीन असून आपली शेती बागायती करावी या हेतूने तब्बल सात वर्षांपूर्वी म्हणजेच ता. २१ जुलै २०१४ रोजी संबंधित कार्यालयाकडे थ्रीफेज वीज जोडणीसाठी रीतसर कोटेशन पोटी पाच हजार ६२७ रुपये भरले असून त्याचे आर क्र. ५६२७९ आहे तर कोटेशन नं. ५६२७९०००७११३-७ हा आहे. अद्याप वीज जोडणी तर मिळाली नाहीच परंतु वरुन वीज बिलापोटी त्यांना ३४ हजार ४७० रुपये चे वीजबिल आले असल्याने वीज वितरण कंपनीच्या प्रतापाबद्दल संबंधित शेतकऱ्यातुन संताप व्यक्त केला जात आहे.

एकीकडे आधीच अल्पभूधारक, त्यात कोरडवाहू शेती. त्यामुळे त्यात काही परवडत नसल्याने संसाराचा गाडा कसा हकावा हा प्रश्न सदर शेतकऱ्यापुढे ठाण मांडून असल्याने त्यांनी आहे. तेवढ्याच शेतीत बागायती करुन कसाबसा व्यवहार ढकलावा म्हणून आणि अधिकृत आपापली वीज जोडणी असावी या हेतूने सात वर्षांपूर्वी रितसर कोटेशन भरले, परंतु अद्यापही वीज जोडणी मिळाली नसल्याने नाहक नुकसान सहन करत चौथाईने दुसऱ्याचे मोटारीचे पाणी घेऊन त्यांनी ऊस, गहू या पिकांची आपल्या शेतीत लागवड केली आहे. तेच जर आज स्वतः चे वीज कनेक्शन असते तर दुसऱ्याला चौथाई माल द्यायची गरज नसती आणि वरुन तब्बल साडे चौतीस हजार रुपयेचे वीज बिल आले.

त्यामुळे पिराजी झंपलवाड यांनी ता. चार मार्च रोजी उपविभागीय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालय कंधार यांच्याकडे लेखी निवेदन करुन मला अद्याप वीज जोडणी न देताच आलेले वीज बिल तात्काळ रद्द करावे अशी तक्रार केली आहे. आणि त्याच्या प्रति महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्या आहेत. त्या निवेदनात त्यांनी न्याय मागत माझे हे वीज बिल तर तात्काळ रद्द करावेच परंतु कोटेशन भरुनही वीज जोडणी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर रितसर कार्यवाही करावी व माझे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी मला तात्काळ वीज जोडणी द्यावी अशी विनंती ही केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com