नांदेड जिल्ह्यात पिकांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना करावी लागतेय कसरत

File photo
File photo

नांदेड : पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतो, हे त्यांनाच माहित. वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतामधील पिकांची सुरक्षा करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः फेस येतो. वन्यप्राण्यांनी शेतात येऊन नुकसान करू नये, यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला साडीचे कुंपण करण्याची शक्कल लढविली आहे. 

शेतात हरिण, रोही, नीलगाय, रानडुक्कर आदी वन्यप्राणी नेहमीच धुडगूस घालतात. हातातोंडाशी आलेले पीक रात्रभरात वन्यप्राणी तुडवतात. पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना रक्ताचे पाणी करावे लागते. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी आपला जीव धोक्यात टाकून रात्र जागून काढतात. थोडे जरी दुर्लक्ष झाल्यास वन्यप्राणी शेतात शिरून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरतात. 

वनक्षेत्राला लागून शेती करणारे शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे मेटाकुटीस आलेले आहेत. पिकांची सुरक्षा करण्यासाठी शेतकरी विविध युक्त्या करून थकले आहेत. बुजगावणे, डांबरगोळी, सोलर कुंपण, तार बांधून वीजप्रवाह सोडणे, फटाके फोडणे, वाघाची डरकाळी, ओरडण्याचा आवाज आदी पर्याय सद्यस्थितीत वापरले जातात. हे आवाज ऐकणे वन्यप्राण्यांना नित्याचे झाल्याने त्याचा फायदा होताना दिसत नाही. 

रानडुक्करांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून, मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करत असल्याचे शेतकरी सांगतात. यंदा अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेले आहे. सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परतीच्या पावसाने केलेले नुकसान भरून निघणारे नाही. 

हे देखील वाचाच - कोरोना टेस्टचा रिपोर्ट नसलेल्या शिक्षकांबाबत मुख्याध्यापकांसमोर पेच
 
कमी किमतीत खरेदी 
शेतीला साडीचे कुंपण करण्यासाठी शेतकरी घरातील जुने कपडे वापरतात. मात्र, ते कमी पडत असल्याने कमी किंमतीत मिळणाऱ्या साड्या शहरातून विकत आणून त्यांचे कुंपण घातले जाते. त्याचाही आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांवर बसतो. 

वीज तारेमुळे जीव धोक्यात  
वन्यप्राणी शेतात येऊ नये, म्हणून बहुतांश शेतकरी शेताला तारेचे कुंपण करून त्यात जिवंत विद्युत प्रवाह सोडतात. शेतात ये-जा करणाऱ्या मजुरांना त्याबाबत माहिती राहत नाही. अनेकदा शेतकरी दिवसा वीजप्रवाह बंद करण्याचे विसरतात. त्यात नाहक शेतात आलेल्या नागरिकाला आपला जीव गमवावा लागतो. यंदा जिल्ह्यात असे प्रकार अनेक घडले आहेत. 

वनविभागाने दखल घ्यावी 
हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये. थोडे पीक घरात आल्यास तितकाच आधार होईल, या अपेक्षेने शेतकरी शेतीला साडीचे कुंपण घालत आहेत. अनेकदा तक्रारी करूनही वनविभाग दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. 
- वामनराव गोराडे (शेतकरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com