नांदेड जिल्ह्यातील पंधरा जिल्हा परिषदेच्या शाळा ‘आदर्श’

File photo
File photo

नांदेड : महाविकास आघाडी सरकारने शालेय शिक्षण विभागाची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ३०० जिल्हा परिषद शाळांची ‘आदर्श शाळा’ म्हणून निवड केली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १५ शाळांचा समावेश आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी, शिक्षणाची गुणवत्ता साधरण्यासाठी शिक्षण विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुशंगाने शिक्षण विभागाने राज्यातील तब्बल ३०० जिल्हा परिषद शाळांची ‘आदर्श शाळा’ म्हणून निवड केली आहे. या शाळांचा शैक्षणिक, भौतिक विकास करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने काढलेल्या अध्यादेशमध्ये म्हटलेले आहे.  

महाविकास आघाडी सरकारचे मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले होते. त्यामध्ये राज्यातील ३०० शाळा ‘आदर्श शाळा’  निवडण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून त्यासाठी सोमवारी अध्यादेशही काढण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यातील एक अशा ३०० शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १५ शाळांचा समावेश आहे. निवडलेल्या शाळा पहिली ते सातवीच्या असून त्यांना पुढील काळामध्ये आठवीचे वर्ग देखील जोडण्यात येणार आहेत.

कशी असेल आदर्श शाळा
ज्या शाळांची ‘आदर्श शाळा’ म्हणून निवड करण्यात आली आहे, त्या शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाणार आहे. यात या सर्वच शाळांना सरकारकडून भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी आणि विज्ञान प्रयोगशाळा यांचा समावेश असणार आहे. तर शैक्षणिक सुविधांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या चौकटी बाहेरील शिक्षण देण्याचा मानस आहे. यात वाचनावर विशेष भर देण्यात येणार आहे. 

विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मुलभूत संकल्पना शिकवल्या जाणार आहेत. ग्रंथालयांमध्ये पूरक शिक्षण देणारी पुस्तके, विश्वकोष, मनोरंजनाची विविध पुस्तके तसेच विविध कलागुण विकसित होण्यासाठी लागणारी संदर्भ ग्रंथ आदी पुस्तके, विविध प्रकारचे अॅप आदी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

रामनाथ मोते यांचे योगदान
माजी शिक्षक आमदार व महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे प्रमुख रामनाथ मोते यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ते संदर्भात सरकारला काही अहवाल दिले होते. प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री व विद्यमान खासदार फौजिया खान यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या अहवालात देखील मोते यांच योगदान होतं. 

‘या’ जिल्हा परिषद शाळा आहेत आदर्श
अंबेगाव (ता.अर्धापूर), देवठाणा (ता.भोकर), अटकळी (ता.बिलोली), मरखेल (ता.देगलूर), वडगाव जं.(ता. हिमायतनगर), पाथरड (ता. हदगाव), आंबुलगा (ता. कंधार), कोसमेट (ता.किनवट), धानोरा (ता.लोहा), तुलसीतांडा (ता.माहूर), डोणगाव (ता.मुदखेड), बापशेटवाडी (ता.मुखेड), कोकलेगाव (ता.नायगाव), कामठा खुर्द (ता.नांदेड), शेळगाव (ता.उमरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com