शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : उर्ध्व पैनगंगा अंतर्गत उन्हाळी हंगामातील पाणीपाळीचे नियोजन

file photo
file photo

नांदेड : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे उन्हाळी हंगाम सन 2020-21 मधील पाणीपाळ्यांचे नियोजन पुढीलप्रमाणे जलसंपदा विभागाने जाहिर केले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 23 जानेवारी रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वोनुमते विचार करुन उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीचे नियोजन केल्याप्रमाणे हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

इसापूर उजवा व डावा कालव्यातून पाणीपाळ्या चालू होण्याचा संभाव्य दिनांक पुढीलप्रमाणे राहील. उन्हाळी हंगाम 2020-21 साठी पहिली पाणीपाळी उजवा व डावा कलवा इसापूरद्वारे 1 मार्च 2021 रोजी, दुसरी पाणीपाळी 27 मार्च 2021 रोजी, तिसरी  पाणीपाळी 23 एप्रिल 2021 रोजी तर चौथी पाणीपाळी 19 मे 2021 रोजी सोडण्यात येईल. सदर आर्वतनासाठी अटी व शर्तीची पुर्तता आवश्यक आहे.

आवर्तन प्रारंभ होण्याच्या व समाप्त होण्याच्या दिनांकामध्ये क्षेत्रीय परिस्थितीनुसार थोडा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही / मंजूर उपसा / मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी / नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात व विहीत दिनांकापुर्वी संबंधित शाखा कार्यलयात दाखल करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणा-या व पाणी अर्ज नामंजुर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणा-या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठाराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकरण्यात येतील. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या / अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही, असे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com