Gram Panchayat Election:प्रत्येकवेळी पॅनलच्या नावात विकास; पण प्रत्यक्षात गाव विकासाअभावी भकास

file photo
file photo

फुलवळ (ता. कंधार, जिल्हा नांदेड) : स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या चालू असलेल्या रंग धुमाळीत गावागावात राजकीय गाव पुढाऱ्यांनी चांगलीच कंबर कसली असून प्रचाराचे माध्यम म्हणून प्रत्येकजण आपापला वचननामा, जाहीरनामा, बॅनरबाजी, पोस्टरबाजी करण्यात मश्गुल झाले आहेत. मतदारांना आश्वासनांची खैरात घालत मतदानाची मदत मागतांना आम्ही गावाचा विकास करु तुम्ही आम्हाला संधी द्या असे सांगतानाच आपापल्या पॅनलला विविध ग्राम विकास असे नाव देत वचनमाना, जाहीरनामा काढून त्यात विविध विकासात्मक कामांचा उल्लेख करत ते प्रसिद्धी पत्रक वाटप केले जात असल्याने मतदारात एकच चर्चा ऐकायला मिळते. ती म्हणजे प्रत्येकवेळी पॅनलच्या नावात विकास, पण प्रत्यक्षात गावचे गाव मात्र अजूनही भकास.

सध्या होऊ घातलेल्या ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ साठी गावागावात निवडणूक रंग धुमाळीचे वातावरण हळूहळू पेटत असून वॉर्ड निहाय उमेदवारांनी आता निवडणूक आखाडा सुलाखून सोडला आहे. आणि तो तसाच आणखी हप्ता कसा धुपत ठेवता येईल याकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे. हळूहळू मतदारांच्या गाठीभेटी, कॉर्नर बैठका, प्रत्यक्षात घरोघरी जाऊन मनधरणी करताना उमेदवार मात्र पार मेटाकुटीला येत असल्याचे पहावयास मिळत आहेत. प्रत्येकजण आपापल्या पॅनलची बाजू पटवून देताना आमचा उमेदवार कसा आणि किती सक्षम आहे हे समजावून सांगत आहेत.

बहुतांश ठिकाणी उमेदवार हे नाममात्र असून पडद्याआड असलेले हिरो मात्र वेगळेच आहेत. ते पडद्याआडचे हिरो मात्र कटपुतलीसारखे दोरी आपल्या हातात ठेवून निवडणूक रणांगण गाजवण्यासाठी त्या- त्या उमेदवारांचा फायदा घेत राजकारण करु पाहत आहेत. तर बरेच ठिकाणी सुदैवाने जर उद्या आपले पॅनल निवडून आलेच तर भविष्यात कोणतेही काम करण्यासाठी किंवा ग्रामपंचायतचा कारभार चालवण्यासाठी आपल्याला अडचणी येऊ नयेत यासाठी त्यांनी आधीच आपापल्या मर्जीचे, अंगठेबाहद्दर, निमशिक्षित उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, तर काही ठिकाणी आपापल्या नात्यागोत्यातल्याच लोकांना उमेदवारी देण्याचे काही पॅनल प्रमुखांनी पसंत केले आहे. 

यंदाच्या ग्राम पंचायत निवडणुकीत कंधार तालुक्यात जवळपास एकूण १५ ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध झाली असून ही तालुक्यासाठी अभिनंदनीय आणि अभिमानास्पद बाब आहेच. पण चालू असलेल्या रणधुमाळीत बहुतांश ठिकाणी तरुण पिढी राजकारणात उतरली असून ते नव्याने पहिल्यांदाच गाव निवडणुकीत उतरले आहेत. बरेच ठिकाणी तेच ते जुनेच ग्राम पंचायत सदस्यांनी सुद्धा पुन्हा मांडी थोपटून या निवडणुकीतही सहभाग नोंदवला आहे. वरुन मी पुन्हा येईन या आशेवर तसा गवगवा करत आमच्याने मागच्या काळात जो विकास करणे झाले नाही तो यापुढे आम्ही नक्की करू असा विश्वास मतदारांना पटवून देत मतदान मागत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com