शंकररावांचा प्रेरणादायी सहवास मला लाभला : डॉ. सुरेश सावंत

Nanded News
Nanded News

नांदेड : मार्च ते जून या चार महिन्यांच्या कालावधीत, लॉकडाऊनच्या काळात, सभोवतालची संपूर्ण परिस्थिती प्रतिकूल असताना, मी ६७२ पृष्ठांच्या गौरवग्रंथाचे संपादन केले आहे.  आज (ता.१४ जुलै) शंकररावजींची जन्मशताब्दी आहे.  हे औचित्य साधून मुंबईत ‘आधुनिक भगीरथ ना. शंकररावजी चव्हाण’ गौरवग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्याला मला उपस्थित राहता आले नसले तरी, आयुष्यातील काही काळ शंकररावांचा प्रेरणादायी सहवास मला लाभला होता, हेच मी माझे भाग्य समजतो, असे मत डॉ. सुरेश सावंत यांनी व्यक्त केले. 

शंकरराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नांदेडच्या नगराध्यक्षपदापासून केली. निष्कलंक चारित्र्य हा शंकररावांचा सगळ्यात मोठा ऐवज होता. त्यांनी आयुष्यात पैसा हा नेहमीच गौण मानला. राबत्या शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असल्यामुळे शेती आणि पाणी हे त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय होते! महाराष्ट्राच्या जलसिंचनाच्या क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करून त्यांनी महाराष्ट्राला भारताच्या जलसिंचनाच्या नकाशावर आणले. त्यामुळे आपण सगळे त्यांना 'महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक' म्हणून ओळखतो. 

समाजाच्या गरजांची होती जाणीव
प्रामाणिकपणा, सचोटी, श्रद्धाळू मन, भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान, तत्त्वनिष्ठा, उच्चतम ध्येयनिष्ठा, कार्यकुशलता, प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन सखोल अभ्यास करण्याची तयारी, गरिबीची जाण, कमालीचा साधेपणा, स्थितप्रज्ञ वृत्ती, शिस्तबद्ध जीवनशैली, वागण्या-बोलण्यातील काटेकोरपणा, प्रशासकीय कार्यातील पारंगतता आणि मुख्य म्हणजे निष्कलंक चारित्र्य असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.  
समाजाच्या गरजांची जाणीव त्यांना होती.
 
समाजासाठी जगले समप्रित आयुष्य
भारताच्या राजकारणात इतक्या निर्लेप वृत्तीचा, निर्मोही आणि अपरिग्रही वृत्तीचा नेता होऊन गेला, हे भावी पिढ्यांना कदाचित खरेही वाटणार नाही. राजकारणी माणसाविषयी दंतकथा वाटावी, असे समाजासाठी समर्पित आयुष्य ते जगले. विचाराने ते निष्ठावंत कॉंग्रेसमन होते, पण आचाराने त्यांचा कल डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीकडे होता. त्यांची प्रत्येक कृती ही अंत्योदयाची होती. त्यांनी राज्यात आणि केंद्रात ज्या ज्या खात्यांचा कारभार सांभाळला, त्या त्या खात्यांवर आपल्या अभ्यासपूर्ण कार्यशैलीने आपली नाममुद्रा उमटविली आहे. त्यांचे प्रशासकीय कौशल्य वादातीत होते. 

हे देखील वाचाच - शहर झाले चिडीचूप...

 
असा आहे गौरवग्रंथ
वाचकांच्या सोयीसाठी १०१ लेख असलेल्या ह्या गौरवग्रंथाची विभागणी सात विभागांत केली आहे. 'सहप्रवासी आणि उत्तराधिकारी' ह्या पहिल्या विभागात २३ राजकीय नेत्यांचे लेख आहेत. विशेष म्हणजे यात पाच माजी मुख्यमंत्र्यांचे लेख आहेत. 'उच्चपदस्थ अधिकारी आणि राजसारथी' ह्या दुसर्‍या विभागात नऊ अधिकाऱ्यांचे अतिशय अभ्यासपूर्ण असे लेख आहेत. तिसऱ्या विभागात ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार आदींचे ३० महत्त्वपूर्ण लेख आहेत. 

'गणगोत' ह्या चौथ्या विभागात शंकररावजींच्या नातेवाईकांचे आठ लेख आहेत.  या लेखांतून जगासाठी 'हेडमास्तर' असलेल्या 'कुटुंबवत्सल नानां'चे विलोभनीय दर्शन घडते. 'मुद्रित माध्यमांची आदरांजली' ह्या पाचव्या विभागात नियतकालिकांतील पूर्वप्रकाशित १६ लेख आहेत. सहाव्या विभागात शंकररावजींची १६ संसदीय भाषणे वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रंथाच्या शेवटी शंकररावजींची मुलाखत आणि जीवनपट देण्यात आला आहे. 

गौरवग्रंथ म्हणजे वैभवशाली दस्तऐवजच
शंकररावजींच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची रंगीत छायाचित्रे ग्रंथाच्या सौंदर्यात भर घालतात. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समकालीन राजकारणावर आणि समाजकारणावर प्रकाश टाकणारा हा एक वैभवशाली दस्तऐवज आहे.
- डॉ. सुरेश सावंत, नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com