गोणारच्या बुद्ध विहारात साकारतेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभ्यास केंद्र

Kandhar tehsildar Vijay Chavan said that if the student works hard, he will succeed in the competitive examination
Kandhar tehsildar Vijay Chavan said that if the student works hard, he will succeed in the competitive examination

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने योग्य परिश्रम घेतल्यास स्पर्धा परीक्षेत निश्चितपणे हमखास यश मिळेल असा विश्वास कंधारचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी व्यक्त केला. कंधार तालुक्यातील गोणार येथे बुद्ध विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास विस्तार अधिकारी जीवन कांबळे गोणारकर यांनी दहा हजार रुपये किंमतीची स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात तहसीलदार चव्हाण बोलत होते.

गोणार येथील बुद्ध विहारातून केवळ धम्म चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यांचा प्रचार प्रसार करणे एवढेच कार्य सुरू नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील पिढी घडविण्यासाठी विहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी मार्गदर्शन केंद्र चालविले जात आहे. येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोक्याच्या आणि महत्त्वाच्या जागा मिळवता याव्यात, यासाठी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नांदेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जीवन कांबळे  गोणारकर यांनी दहा हजार रुपयेची स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट दिली. 

यावेळी मुखेडचे तहसीलदार विजय चव्हाण म्हणाले, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःचे करिअर घडवता येते. एवढेच नाही तर आपल्या कुटुंबाचा आणि गावाचेही नावलौकिक करता येऊ शकतो. एक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झाला तर केवळ तो आणि त्याचे कुटुंब सुधारत नाही तर त्याची प्रेरणा घेऊन असे असंख्य विद्यार्थी घडू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित ठरवून ते ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड यश मिळविले. आपणास माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला.

आपल्या अचाट ज्ञानातून आपल्या सर्वांसमोर जो आदर्श निर्माण केला त्या आदर्शाला आपली प्रेरणा स्त्रोत म्हणून विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी परिश्रम घेणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्यापेक्षा वरिष्ठ विद्यार्थ्यांची किंवा या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या व्यक्तींकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. शिवाय योग्य नियोजन, अभ्यासातील सुसूत्रता ठेवणे आवश्यक आहे. गरिबीवर मात करून आपण आपले ध्येय गाठू शकतो असा दृढ निश्चय करणे आवश्यक आहे. आपण ग्रामीण भागातील आहोत, आपणास यश मिळणार नाही अशी मनात असणारी भीती बाजूला काढणे आवश्यक आहे . तरच आपण ध्येय प्राप्ती गाठू शकतो.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पताका आजची पिढी पुढे नेऊ शकते. त्यासाठी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळाले पाहिजे. अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षेत मागे राहिले नाहीत याची जाणीव ठेवत गोणार येथील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा सकारात्मक फायदा घेत ज्ञानाची वृद्धी करत, स्वतःचा विकास करत असताना देशाचा विकास डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही तहसीलदार विजय चव्हाण म्हणाले.

यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांनी आपण स्पर्धा परीक्षेत मिळविलेल्या यशाची गाथा व्यक्त केली. कठोर परिश्रम ध्येयप्राप्तीची जिद्द आणि परिस्थितीची जाणीव या बाबींमुळे आपण तहसीलदार पदापर्यंत पोहोचू शकलो असेही चव्हाण यावेळी म्हणाले. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना भरकटून न जाता आपले यश गाठण्यासाठी निश्चित असे मार्ग निर्माण करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी विस्तार अधिकारी जीवन कांबळे गोणारकर म्हणाले, ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोक्‍याच्या जागा मिळाल्या पाहिजेत. बुद्धविहारातून ज्ञानाचा मार्ग दाखविला जातो. त्यामुळे गोणार येथील बुद्ध विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्र हे मैलाचा दगड ठरला पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची तमा बाळगू नये. आपण आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहोत या विचारात गुरफटून न राहता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी काय हवे हे सांगावे ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वासही विस्तार अधिकारी जीवन कांबळे गोणारकर यांनी व्यक्त केला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल गोणारकर यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत गोणारकर यांनी तर आभार प्रदर्शन सदानंद गोणारकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच हनुमंतराव पाटील पवळे, रामदास वाघमारे, सिद्धार्थ गोणारकर, रंजीत गोणारकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान राष्ट्रपाल गोणारकर यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com