राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्ते खराब

संबंधित विभागाचे दुर्लक्ष, वाहनधारकांना करावी लागतेय तारेवरची कसरत
Nanded bad construction of village roads citizens face problem to transportation
Nanded bad construction of village roads citizens face problem to transportationsakal

बरडशेवाळा : शासन विविध योजनांच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र, ठेकेदार काम घेण्यापासून ते पूर्ण करेपर्यंत लगेचच रस्ते खराब होत असल्याने वाहनधारकांसह सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली असून जनतेच्या हितासाठी असलेले शासनाचे काम म्हणजे अधिकारी, कर्मचारी यांचे पोट भरण्याची योजना बनली असल्याचा आरोप होत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न कोठे मांडावा? हा प्रश्न वाहनधारकासह सर्वसामान्यांना पडला आहे.

नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात जमीनीचे भुसंपादनासह कोट्यावधी रुपये खर्च करून कामे झाली परंतु कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आणि संबंधित विभागाने दुर्लक्ष केले असल्याने कालावधी संपुनही काम पूर्ण झाले नाही. तसेच काम करत असताना कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातात अनेक जणांना आपला जीव गमावावा लागला तर अनेक जणांना अपंगत्व आले.

झालेल्या अर्धवट कामात अनेक ठिकाणी रस्त्यावर जागोजागी तडे गेले आहेत. आता या तड्याचे अंतर वाढत असून दुचाकीचे चाक मधात जात असल्याने अपघाताचे आणखी प्रमाण वाढणार आहे. ग्रामीण भागासाठी विविध योजनेच्या माध्यमातून दळणवळणाच्या दृष्टीने सोयीसाठी असलेल्या बरडशेवाळा येथील विविध कार्यालयीन कामकाज व बामणी फाटा येथील बाजारपेठेसह बाळापूर, निवघा बाजार, केदारनाथ, तामसा या सोयीच्या मार्गावरील झालेल्या कामात ठेकेदार आणि अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे कारभारात कामाचा दर्जा खालावला असल्याने जागोजागी रस्ता खराब झाला आहे. यामुळे बामणी फाटा ते करमोडी उंचाडा, पिंपरखेड नेवरी नेवरवाडी केलेले काम पुढे काम, मागे सपाट अशी अवस्था झाली आहे.

हदगाव तालुक्यातील तिर्थक्षेत्र केदारनाथ व संत नंदी महाराज कवाना येथे जाण्यासाठी अतीशय सोयीचा व जवळचा म्हणून असलेला बरडशेवाळा ते कवाना केदारनाथ मार्ग पुढे तामसा, भोकर विभागासाठी आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या कामाचे टप्पे टप्पे करुन कामावर लक्ष दिले नसल्याने पुढे काम, मागे सपाट अशी अवस्था झाली आहे. तर बरडशेवाळा ते कवाना दोन किलोमीटर अंतराच्या रस्ताची दोन वर्षांपासून डागडुजी केली नसल्याने जागोजागी चाळणी झाली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यासंदर्भात हदगाव विभागाचे सार्वजनिक बांधकामांचे अभियंता श्री. भिसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर संबंधित विभागातील अभियंत्याशी संपर्क साधला तर उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ काढत आहेत.

राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करूनही नव्याने केलेल्या रस्त्याच्या कामाची वाट लागली. संबधित विभागाच्या निष्काळजीपणा अनेकांच्या जीवावर बेतला तरीही याकडे दुर्लक्ष केले जाते. हे दुदैव आहे.

- अरुण चव्हाण उंचाडकर.

बरडशेवाळा ते केदारनाथ हा मार्ग दोन तिर्थक्षेत्रासह पुढील ये-जा करण्यासाठी आणखी सोयीचे ठरणार असून कवाना दोन किलोमीटर अंतराची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम होणे गरजेचे आहे.

- गजानन अनंतवार कवानकर.

वांरगा ते महागाव या राष्ट्रीय महामार्गावरील काम आमच्या कंपनीने तसेच दुसऱ्या कंपनीच्या मदतीने सुरु आहे. ज्या ठिकाणी तडे गेले आहेत. त्या ठिकाणी कंपनीकडून पंधरा वर्षे डागडुजी करण्यासाठी करार केला आहे.

- श्री. राव, सीपीएम, सद्‍भावना कंपनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com