
नांदेड : न्यायालयाच्या निर्देशानुसार बाभळीचे पाणी तेलंगणात
धर्माबाद : तेलंगणा व महाराष्ट्र या दोन राज्यात प्रचंड राजकीय संघर्षा नंतर पुर्णत्वास आलेल्या बाभळी बंधाऱ्याचे सर्व दारे सर्वोच्च न्यायालयाच्य निर्देशानुसार शुक्रवारी एक जुलै रोजी उघडण्यात आले व बंधाऱ्याच्या पात्रातील शिल्लक जलसाठा त्रिसदस्य समितीच्या उपस्थीतीत सदरील पाणी पोचमपाड (श्रीराम सागर) धरणात सोडण्यात आले.
बंधारा पुर्ण होऊन नऊ वर्षे उलटली तरी ही राजकीय उदासिनतेअभावी या पाण्याचा सदउपयोग किंवा हरितक्रांतीसाठी सक्षम विनियोग झालाच नाही. त्यामुळे दरवर्षी तारीख आली की ‘दारे लावा पाणी अडवा’ गरजेच्या वेळी शेजारी राज्यास पाणी सोडा... एवढीच औपचारीकता पार पाडली जाते. त्यामुळे सुमारे २२५ कोटी खर्च होऊन देखील इंच भर हि क्षेत्र ओलीताखाली येऊ शकले नाही. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ता.२९ ऑक्टोंबर २०१३ मध्ये बाभळी बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या वेळी व्यसपिठावर विराजमान अनेक मंत्र्यांनी हा भाग एक वर्षात सिंचनाखाली येईल व या परिसराच्या शेती हरित क्रांतीने सुजलाम सुफलम होतील असे अभिवचन दिले होते.
बाभळी बंधाऱ्याचे दारे बंद करण्यात आल्यानंतर बंधाऱ्याच्या जलपात्रात २.७४ टिएमसी पाणी साठविले जाते. हा जलसाठा कोणत्या उपयोगासाठी घ्यावा याबद्दल मागील नऊ वर्षात कसल्याही प्रकारचा कृती आराखडा तयार करण्यात आला नाही. केवळ माध्यमातून पत्रकबाजी करण्यात आली. शुक्रवारी (ता. एक) जुलै रोजी केंद्रिय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता एस. श्रीनिवासराव, पोचमपाड धरणाचे अभियंता एन. व्यकटेश्वरलु, महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे यांच्यासह त्रिसदस्य समितीचे सर्व सदस्य तसेच विविध प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थीतीत दारे उघडून पाणी सोडण्यात आले.
हरितक्रांतीचे स्वप्न आजही अर्धवट
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार (ता. एक) जुलै रोजी बाभळी बंधाऱ्याचे सर्व १४ दारे वर उचलली जातात. व त्यानंतर ता.२९ ऑक्टोंबर रोजी सर्व दारे लावली जातात. जमलेल्या पाणीसाठ्या पैकी ०.६० टीएमसी पाणी (ता.एक) मार्च रोजी तेलंगणात सोडण्यात येते. दरवर्षी दारे लावणे व दारे उघडणे याच वेळी या बंधाऱ्याच्या पाण्याच्या विनियोगावर जोरदार चर्चा केली जाते. परंतु प्रत्यक्षात पुन्हा त्या विषयाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे कोणताही सक्षम आराखडा तयार होत नाही. म्हणून परिसरातील हरितक्रांतीचे स्वप्न आजही अर्धवट आहे.
Web Title: Nanded Court Order Babhali Dam Water Supply To Telangana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..