Nanded : दिवाळी आली अन् महागाईला ओवाळून गेली

शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले; अतिवृष्टीचा निधी मिळणार कधी?
Inflation
Inflationsakal

कुरुळा : प्रथा परंपरेनुसार अनेक सण उत्सव गोरगरीब शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी पर्वणी असते. त्यात दीपावली हा सणही आनंदोत्सव घेऊन येणारा असतो. ग्रामीण भागात ‘दीन दीन दिवाळी गाई म्हशी ओवाळी...’ असे आनंदी गीत आठवते खरे परंतु वास्तवातली महागाई मात्र या सण उत्सवाच्या आनंदावर विरजण ठरली. त्यात अतिवृष्टीची आर्थिक मदत अद्याप झाली नाही त्यामुळे कुरुळ्यासारख्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडल्याचे चित्र आहे.

दिवाळी म्हंटली की दिव्यांची आरास, रुचकर पदार्थाची मेजवानी डोळ्यासमोर उभी राहते. लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा असे नानाविध पक्वान्न गृहिणी बनवण्यात व्यस्त असतात. मागील दोन वर्ष दीपावलीवर कोरोनाची आपत्कालीन परिस्थिती होती. कोरोनाच्या गर्द धुक्यातून सावरताना कुरुळ्यासारख्या ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्यासह आर्थिक ससेहोलपट झाली.

परिस्थिती पूर्वपदावर येत असताना यंदाची दिवाळी जेमतेम साजरी होईल अशी नागरिकांची धारणा असतानाच दिवाळसनावर महागाईचा काळोख एवढा काळाकुट्ट झाला की, काही प्रमाणात हसू तर काही प्रमाणात डोळ्यात आसू घेऊन सण साजरा करावा लागला. जवळ असलेली जेमतेम पुंजी पदरमोड करत शेतकरी आणि शेतमजूर घरातील पोराबाळाच्या आनंदासाठी प्रयत्न करताना दिसले, तर काहींनी कापड व किराणा दुकानाकडे चकरा मारत उसनवारीसाठी अर्जव केली.

खाद्यतेल, साखर, डाळ, रवा यासम इतर दिवाळीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या किराणा मालाच्या महागाईने नागरिकांचे पुरते कंबरडे मोडले आहे. सोयाबीन काढणीनंतर आता हाताला काम नाही आणि सरकारने घोषित केलेल्या अतिवृष्टीचा दाम नाही. यामुळे दिवाळसनासाठी आर्थिक तजवीज करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अतिवृष्टीच्या निधी वाटपाला सुरवात झाली असून अल्फाबेटिकली प्रत्यक्ष दिवाळीपूर्वी घोषित केलेला निधी मात्र शेतकऱ्यांना फार उशिरा मिळणार आहे. त्यामुळे एकीकडे आर्थिक चणचण तर दुसरीकडे महागाई आशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

आनंदाचा शिधा अजूनही मिळण्यास बाधा

राज्य शासनाच्या वतीने सर्वसामान्य जनतेला केवळ १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळणार असल्याची घोषणा झाली. पुरवठा विभागाकडून गावोगावी विद्यमान पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमा असलेल्या पिशव्या स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचल्या खऱ्या परंतु त्यातून देण्यात येणाऱ्या चार पदार्थापैकी केवळ रवा आणि डाळ उपलब्ध झाले असून खाद्यतेल आणि साखर मात्र यातून गायब असल्याने वाटपासाठी स्वस्त धान्य दुकानदारासमोर मोठा पेचप्रसंग उद्भवला आहे. ता.२५ रोजी दीपावलीच्या आदल्या रात्री साधारणतः आठ वाजता पिशव्या आणि दोन पदार्थ उपलब्ध झाल्याचे दुकानदार सांगत आहेत. परंतु अद्याप आनंदाचा शिधा पोहोचला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com