Nanded : ४९ हजार हेक्टर पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान

मदतीची प्रतीक्षा; किनवट तालुक्यातील ५३ हजार ४५१ शेतकर्‍यांना फटका
agriculture damage
agriculture damage sakal

किनवट : यंदाच्या जुलैमधील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात तब्बल चार लाख ९७ हजार ४३३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात किनवट तालुक्यातील ५३ हजार ४५१ आपद्ग्रस्त शेतकर्‍यांच्या ४९ हजार ३३२ हेक्टर बाधित क्षेत्रातील पिकांचा समावेश आहे. शेतकर्‍यांना या हानीपोटी अनुदानाद्वारे दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासनाकडून ६७ कोटी नऊ लाख १५ हजार २०० रुपयांच्या अपेक्षित निधीची मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील एकूण नऊ मंडळात जुलैमध्ये तब्बल सहा वेळा अतिवृष्टी झाली आहे. त्यात जलधरा मंडळात चार वेळा, इस्लापूर व शिवणी मंडळात प्रत्येकी तीन वेळा तर किनवट, बोधडी व सिंदगी मोहपूर मंडळात प्रत्येकी एक वेळा अतिवृष्टी झाली आहे. पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीतील पावसाची सरासरी ९५१.९० मिलीमीटर आहे. केवळ अडीच महिन्यातच अर्थात ता. १५ ऑगस्टलाच पावसाने ही सरासरी ओलांडलेली आहे. ता. १५ ऑगस्टपर्यंत तालुक्यात पडलेला एकूण पाऊस ९६१.५० मिलीमीटर आहे. त्याची टक्केवारी १०१.०१ आहे.

तालुक्यातील यंदाच्या खरीपातील जिरायती पिकाखालील एकूण क्षेत्र ७८ हजार १४४ हेक्टर आहे. त्यातील ५३ हजार ४५१ शेतकर्‍यांचे ४९ हजार ३३२ हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर व इतर पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. त्यापैकी कापसाचे बाधित क्षेत्र २७ हजार ९५४ हेक्टर, सोयाबीनचे १६ हजार ५४० हेक्टर, तुरीचे तीन हजार ८३१ हेक्टर, तर मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांचे मिळून एक हजार सात हेक्टर क्षेत्रातील पिकांना हानी पोहोचली आहे. नूतन विराजमान झालेल्या शिंदे सरकारने आपद्ग्रस्त शेतकर्‍यांविषयी अनुकंपा दाखवून मदतीची रक्कम वाढविलेली आहे. त्यांच्या घोषणेनुसार बाधितांना प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मिळणार आहेत. त्याची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत आहे. यानुसार तालुक्यातील बाधित शेतकर्‍यांसाठी ६७ कोटी नऊ लाख १५ हजार २०० रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असल्याचे महसूलच्या सूत्रांकडून कळाले.

पूर्वी राज्य शासनाचा अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीसाठीचा बाधित पिकांच्या नुकसान भरपाईचा प्रचलित दर जिरायतसाठी प्रतिहेक्टर सहा हजार ८०० रुपये, बागायतसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ५०० रुपये, तर फळपिकांसाठी प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांचा प्रचलित दर दोन हेक्टरच्या मर्यादेत होता. ता. २२ ऑगस्ट २०२२ च्या शासननिर्णयानुसार शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकर्‍यांना जिरायतसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये, बागायतसाठी प्रतिहेक्टर २७ हजार रुपये तर फळपिकांसाठी ( बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी) प्रतिहेक्टर ३६ हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यास राज्यशासनाने मंजुरी दिलेली आहे.

- डॉ. मृणाल जाधव, तहसीलदार, किनवट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com