नांदेड : 'अर्धवट' स्मशानभूमीमुळे मृत्यूनंतरही अवकळाच

मुखेडला पुरात वाहून गेली स्मशानभूमी मुक्रमाबाद-बाऱ्हाळीत उघड्यावरच दाह संस्कार
Nanded mukhed incomplete cemetery
Nanded mukhed incomplete cemeterysakal

मुखेड : तालुकयात स्वातंत्र्यानंतरही स्मशानभूमीची अवस्था गंभीरच असून विविध जाती-पातीच्या नावावर स्मशानभूमीची वाटणी झाल्यामुळे मरणानंतरही मृतदेहाची अवहेलनाच होत आहे. आठ महिन्यापुर्वी आलेल्या पुरात शहरातील स्मशानभूमीच वाहून गेली असल्याने अर्धवट शिल्लक असलेल्या जागेवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याचे चित्र दिसत आहे. तर मुक्रमाबाद व बाऱ्हाळी या गावात सार्वजनिक अशी अधिकृत स्मशानभूमी नसल्याने उघड्यावरच दाहसंस्कार करण्याची वेळ आली असून शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

माणसाच्या आयुष्यात होणाऱ्या सोळा संस्कारापैकी सर्वात शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. पुर्वीच्या काळात लोकसंख्येची घनता कमी असल्यामुळे गावाच्या लगत असलेल्या पडीक व न कसणाऱ्या जमीनीत अंत्यसंस्कार केले जायचे. मात्र मागील तीन-चार दशकामध्ये वाढत चाललेली लोकसंख्या व अपुरी होत असलेली जागा या मुळे शेतजमीनींचे भाव गगनाला भिडले असल्याने अंत्यसंस्काराच्या जागा लाखो रूपयांना विकल्या जात आहेत.

तालुक्यात १२७ महसुली गावे असून १३५ गाव- वाडी तांड्याचा समावेश असलेल्या गावा पैकी मुक्रमाबाद, बाऱ्हाळी, सलगरा, खरबखंडगांव, चांडोळा, बेटमोगरा, दापका आदी मोठ्या गावासह निम्म्याहून अधिक गावात स्मशानभूमी संकल्पना अजूनपर्यंत अस्तित्वात नाही. तर ज्या गावांमध्ये स्मशानभूमी आहेत. त्या गावात स्थानिक पातळीवरील अडचणी व जागांचे वाद यामुळे सार्वजनिक स्मशानभूमी असूनही उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात.

तालुक्यातील बाऱ्हाळी येथे शासनाकडून एका खासगी जागेत स्मशानभूमी बांधण्यात आली मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जागा मालकाने विरोध केल्याने चक्क उघड्यावरच अंत्यसंस्कार केल्या जात आहेत. तर मुक्रमाबाद येथे केवळ आर्यवैश्य समाजाची खासगी टीन शेडची स्मशानभूमी वगळता इतर अठरा पगड जातींना आजही उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे. भर पावसाळ्यात तर कहरच होतो. चिखलामधून वाट काढत नदी काठी नेऊन अंत्यसंस्कार केले जातात.

या दरम्यान पाऊस आला तर अर्धवट जळालेल्या मृतदेहावर पुन्हा दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. तालुक्यातील अनेक गावात सध्या मुस्लिम समाजाचे कब्रस्तान वगळता, दलित, मातंग, लिंगायत, मराठा आदी समाजाची काही स्मशानभूमीची राखीव जागा वगळता इतर अठरा पगड जातींना मरणानंतरही अंत्यसंस्कारासाठी झगडावे लागत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

गाव तिथे स्मशानभूमीसाठी गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही गाव पातळीवर बैठका घेतल्या असून २६ गावांतील स्मशानभूमी उभारणीसाठी प्रस्तावित आहेत. यात १२ गावामध्ये शासकीय जागेवर बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत तर १४ गावांमधील खासगी व्यक्तींकडून त्या-त्या ग्रामपंचायतींनी जागा खरेदीकरून खासगी वाटाघाटीतून स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी प्रस्तावित केले आहेत.

- काशीनाथ पाटील, तहसीलदार.

स्मशानभूमीच्या कामासाठी शासनस्तरावरून सकारात्मक प्रतिसाद असून ज्या-ज्या गावांमध्ये जागांची उपलब्धता आहे किंवा एखादा खासगी व्यक्ती जागा दान देऊ इच्छित आहे त्या गावातील सरपंच, ग्रामसेवकांनी तातडीने संपर्क साधल्यास प्रस्ताव तयार करून अद्यावत स्मशानभूमी उभारणीसाठी प्रयत्न करता येईल.

- तुकाराम भालके, गटविकास अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com