Nanded : शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा झाला चुराडा

शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशाच; भाव पडले अन् मालही गेला
Nanded : शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा झाला चुराडा
Nanded : शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा झाला चुराडाsakal News

नांदेड : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी नीतीची तसेच, निसर्गाच्या अवकृपेचा शेतकऱ्याला चांगलाच फटका बसला आहे. १२ हजार रुपये क्विंटल सोयाबीनला भाव सुरु असतानाच केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात केल्याने सोयाबीनचा भाव अवघ्या साडेचार हजारावर येऊन ठेपला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी रंगविलेली सोनेरी स्वप्न भंग झाली आहेत.

यंदा भरघोस उत्पन्न पीकवून डोईवर असलेले बॅंकेचे, सावकारी कर्ज फेडून मुला-मुलींचे शिक्षणाबरोबर त्यांचे लग्न करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे. त्यासाठी घेतलेल्या कर्जाचे साधे व्याज देता येणार नाही अशी बिकट परिस्थिती निसर्गाच्या लहरीपणामुळे बनली आहे. विवाहयोग्य मुलीचे हात पिवळे कसे करायचे, व अशा खडतर प्रसंगातून संसाररुपी गाडा कसा हाताळायचा, याच विवंचनेत देशाचा पोशिंदा समजणारा शेतकरी आज मरणासन्न अवस्थेत जगत आहे.

दुबार पेरणी करूनही काहीच शिल्लक नाही

कोरडवाहू शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला कधी अतिवृष्टी, कधी अवर्षणाचा फटका गेल्या दशकापासून बसत आहे. यंदा बियाणे, रासायनीक खते यासह सोयाबीनच्या बियाणांच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याने पेरणी करताना शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. एकीकडे महागडे बियाणे, रासायनीक खते असताना केलेली पेरणी फिस्कटली व दुबार, तिबार पेरणीचे संकट म्हणून शेतकऱ्यांच्या समोर उभे ठाकले होते. पुन्हा सावकाराचे उंबरठे झिजवत दुबार पेरणी केली. मात्र, अतिवृष्टीमुळे सावकाराचे व बॅंकेचे कर्ज फेडता येईल एवढे सोयाबीन, मूग या पिकांचे उत्पन्नही शेतकऱ्याच्या पदरी पडताना दिसत नाही.

पंचनामे झाले गायब

शासनाच्या नियमानुसार ६५ मिलीमीटर पाऊस झाला तर, तो अतिवृष्टीत बसतो. गत पंधरा दिवसांपासून दररोज मुसळधार पाऊस बरसत आहे. निकषाची मर्यादा ओलांडली आहे. तीस टक्के जमिनीवर अजूनही पाणी आहे. उभ्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत. मात्र, जिल्ह्यात कोठेच पंचनामे होताना दिसत नाहीत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी घोषणा केली. मात्र, आदेश आले नसल्याने प्रशासन आदेशाची वाट बघत आहेत. तर, शेतकरी पावसाच्या उघडीपीची वाट बघत आहेत.

शासनाने सध्या राज्यात गाजत असलेला सारीपाटाचा खेळ दूर सारून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे व त्यांना आर्थिक सक्षम कसे करता येईल, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

- रामराव गजानन पचलंगे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com