हंगाम संपला तरी कर्ज नाहीच

download.jpg
download.jpg

भोकर, (जि. नांदेड) ः भोकर विधानसभा मतदारसंघ हा मंत्र्यांची खाण म्हणून वेगळी छाप आहे. याच ठिकाणी परतीच्या पावसाने खरीप पिकाची नासाडी झाली. देशाचा आर्थिक कणा असलेल्या बळीराजाला आपल्या न्यायहक्कासाठी टोहो फोडण्याची वेळ आली आहे. खरीप हंगाम संपत आला तरी बॅंकेतर्फे पीककर्ज दिले नाही. सतंप्त झालेले शेतकरी बॅंकेच्या जाचाला कंटाळून चक्क रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. 

‘मंत्री’ होण्याचा बहुमान 
भोकर तालुक्यातील राजकीय आखाड्यात आज पर्यंत बऱ्याच लोकप्रतिनिधींना ‘मंत्री’ होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. मंत्र्यांची खाण अशी वेगळी छबी निर्माण झाली आहे. परिणामी तालुक्यातील विधायक विकास कामांना झुकते माप मिळाले आहे. अनेक प्रलंबित कामे प्रगतीपथावर आहेत. विशेषता योगायोगाने मतदारसंघाला माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सारखा राजकीयदृष्ट्या गब्बर माणुस भेटला आहे. यापूर्वी शंकरराव चव्हाण दिंगबंरराव बिंदू, माजी मंत्री डॉ. माधवराव कीन्हाळकर यांनी आपले नेतृत्व केले होते. राजकीय बाबतीत तालुका तसा परिपक्व असून एकापेक्षा एक सरस माणसे लाभली आहेत हे जनतेच भाग्य होय. 

बारीकसारीक गोष्टींकडे त्यांचे नेहमी लक्ष 
सध्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे नेतृत्व आले आहे. येथील बारीकसारीक गोष्टींकडे त्यांचे नेहमी लक्ष असते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व संबंधित अधिकारीऱ्यांना आवश्यक त्या सुचनाही दिल्या आहेत. परतीचा पाऊस काही पाठ सोडायला तयार नाही. शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. सोयाबीन, कापुस पाण्यावर तरंगतो आहे. खरिपातील सर्व पिकांची नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरात आणि खिशात एक छदाम सुध्दा नाही. जगायचे कसे हा प्रश्न भेडसावत आहे. शासन शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे. अशी ग्वाही राजकीय पुढारी देत आहेत. आजच्या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.

धरणे आंदोलन करून न्याय मागत आहेत
ग्रामीण भागातील चित्र मात्र वेगळे आहे. शहरातील बॅंकेत हतबल झालेले शेतकरी पिककर्जासाठी चकरा मारत आहेत. पण अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. दलालाशी हाताशी धरून मोजक्याच शेतकऱ्यांची कामे केली जातात अशा तक्रारी आहेत. खरिप हंगाम संपत आला तरी पीककर्ज मिळाले नाही. या गंभीर बाबीकडे कुणीच लक्ष देत नसल्याने मेटाकुटीला आला शेतकरी मुजोर बॅंक अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून चक्क रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने उपोषण, धरणे आंदोलन करून न्याय मागत आहेत. बॅंक व शेतकरी यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत राजकीय पुढारी यांनी मध्यस्थी करून हातबल झालेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com