लॉकडाउन नंतर बेरोजगारांना सावरण्याची संधी....कोण म्हणतय ते वाचा

Berojgar.jpg
Berojgar.jpg

नांदेड : कोरोना विषाणूच्या संकटामुळे महाराष्ट्रातून परप्रांतीयांचे लोंढे आपापल्या राज्यामध्ये स्थलांतरित होत आहेत. आणि पुढील सहा महिने ते एक वर्षभर परत येण्यास धजावणार नाहीत अशी स्थिती दिसते. संकट नेहमीच सोबत संधी घेऊन येत असते. आपल्या राज्यात नेहमीच परप्रांतीयाने शिरकाव केल्याची ओरड होत असते. आता या संकटास संधीत रूपांतर करण्याची वेळ येथील बेरोजगार, शेतकरी, प्रशासन व राजकर्त्यांना उपलब्ध होणार आहे.

बेरोजगार तरुणांना मोठी संधी 
महाराष्ट्रातील बेरोजगारांनी आपल्यातील असलेली बलस्थाने, कमतरता, उबलब्ध होणाऱ्या संधी व धोके यांचा वापर मोठ्या खुबीने केला पाहिजे. SWOT analysis (strength,weakness, opportunity and threats). महाराष्ट्रातील रोजगाराच्या बाबतीत सांगायचे झाले तर येथील पूर्वांपार चालत आलेले खिचडी, भज्जे, पोहा हद्दपार होऊन यांची जागा इडली, वडा सांबर, उत्तप्पा, डोस्यांनी घेतली. म्हणजेच दक्षिण भारतीय बेरोजगारांनी घेतली. तीच संधी पुन्हा महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांनी स्वच्छता राखून काबीज करणे गरजेचे आहे. नव्हे काळाची गरज आहे.

उद्योग व्यवसाय सुशिक्षित बेरोजगारांना संधी
कोरोनाच्या महामारीमुळे होणारे स्थलांतर मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातील उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने तीन शिफ्टमध्ये न चालता एका शिफ्टमध्ये होतील. त्यास आपल्या राज्यातील सुशिक्षित तरुणांनी व बेरोजगारांनी संधी समजून काबीज करावी व आपली पकड मजबूत करावी. आज छोट्या शहरापासून ते मोठ्या महानगरांमध्ये चौका चौकात, नाक्या नाक्यावर राजस्थानी पाणीपुरी, भेळपुरी, बदामशेक, मिल्कशेक मिळतो. त्या धंद्यामध्ये कमी बजेटमध्ये ताबा घ्यावा. तसेच बांधकाम क्षेत्रातील ग्रॅनाईट, फरशी कामावरील त्यांचे प्राबल्य कमी करून राज्यातील गवंडी, मिस्त्री, कारागिरांनी, बेरोजगारांनी या कामात शिरकाव करावा. ऑनलाईन सेल्समन च्या माध्यमातून मार्केटिंग मध्ये उतरावे. 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे वळावे 
महाराष्ट्राचा शेती हा प्रधान उद्योग असताना शेतीचे क्षेत्र कमी-कमी होत आहे. शेतीस व शेतकऱ्यास सामाजिक प्रतिष्ठा देण्यास एक वर्ग तयार नाही. कोरोना नंतरच्या महाराष्ट्रात आपत्कालीन नियोजन करून सुशिक्षित तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे वळले पाहिजे. भावनिक पारंपारिक शेती न करता शेतीस व्यावसायिकतेचा दर्जा प्राप्त करून दिला पाहिजे. शेतमालाकडे व्यापारी माल समजून मागणीप्रमाणे उत्पादन घ्यावे लागेल. तसेच काढणी पश्चात तंत्रज्ञानावर भर देऊन प्रतवारी, पॅकेजिंग, शीतगृह, प्रक्रिया यांचाही तरुणाने शेतकऱ्यांने विचार करावा लागेल. भविष्यातील किंमतीचा अंदाज घेऊन विपणन (मार्केटिंग) कौशल्य निर्माण करून साखळी तयार करावी. व त्यास प्रशासनाने, राज्यकर्त्यांनी अधिकाधिक गुंतवणूक देऊन बळकट करावे लागेल.

फुलशेतीमधून विविध संधी
कोरोनामुळे फुलशेती मधील काढणी पश्चात प्रक्रिया उद्योगांच्या अभावामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. यावर मात करण्यासाठी फुलप्रक्रियेतून विविध सुगंधी अत्तरे, औषधी, गुलकंद इत्यादी पदार्थ निर्माण करण्यासाठी स्थानिक कारखानदारीने संधी समजून पुढे येणे व रोजगार निर्मिती करणे काळाजी गरज आहे. त्यास शासनाने शेतकऱ्यास व उद्योगास हातभार लावला पाहिजे. फुलशेतीवर आधारित मधमाशी पालनासारखे जोडधंदे उभारावेत. कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्या बेरोजगारांनी रोजगार हमीच्या माध्यमातून गावातच रोजगार उबलब्ध करून घेऊन रोजगारांच्या संधी शोधाव्यात. सुशिक्षित तरुण आणि बेरोजगार यांनी महात्मा बसवेश्वरांच्या ‘काय कवे कैलाश’ या उक्ती प्रमाणे काम हेच परमेश्वर मानून कामास प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी. कोणत्याही कामास श्रेष्ठ कनिष्ठ न मानता काम करण्याची तयारी ठेवावी. व महाराष्ट्रात येऊ पाहणाऱ्या उद्योगधंद्यांना महाराष्ट्र हे रोजगाराचे तीर्थ वाटावे.

- वसंत वैजनाथ जारीकोटे
नांदेड.
(राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com