डॉ. सुरेश सावंत यांच्या हीरक महोत्सवानिमित्त रविवारी‘आचार्य’या गौरव ग्रंथाचेही प्रकाशन 

file photo
file photo

नांदेड : अहर्निश विद्यार्थीहित, साहित्यलेखन, संपादन, व्याख्याने आदी समाजहितैषी कार्यामध्ये गेली दोन दशकांहून अधिक ‘कार्यमग्नता जीवन व्हावे’ या व्रताने कार्यरत असणाऱ्या प्राचार्य डॉ. सुरेश सावंत यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त भव्य सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.

ता. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल विसावा पॅलेसमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी उद्योग समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील ह्या राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून जनसंपर्क तज्ज्ञ तथा हैद्राबादच्या हिंदी प्रचार सभेचे परीक्षा मंत्री प्रा. सुरेश पुरी तसेच राज्याचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांची उपस्थिती राहणार आहे.

याच कार्यक्रमात डॉ. सावंत यांच्याविषयी त्यांच्या सुहृदांचे लेखन असणाऱ्या ‘आचार्य’या गौरवग्रंथाचे प्रकाशनही होणार आहे. याशिवाय डॉ. सुरेश सावंत लिखित ‘अक्षरयात्री’,‘नदी रुसली, नदी हसली’या ग्रंथांचे तसेच डॉ. मथु सावंत लिखित ‘अधोरेखित’या ग्रंथाचे, तर आघाडीचे संवेदनशील युवा पत्रकार संदीप काळे यांच्या ‘सख्ख्या बहिणी पक्क्या मैत्रिणी’या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

डॉ. सुरेश सावंत राज्यातील आघाडीचे लेखक असून साहित्यक्षेत्रात त्यांचे विपुल लेखन आहे. याशिवाय त्यांनी विविध मान्यवरांचे चरित्रलेखनही केले आहे. ग्रंथ संपादन क्षेत्रातही त्यांनी आपले कसदार आणि अभ्यासपूर्ण नैपुण्य सिद्ध करीत अनेक ग्रंथांचे संपादन केले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री कै. शंकररावचव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आधुनिक भगीरथ’या महाग्रंथाचे नुकतेच संपादन केले आहे. राज्य शासनाच्या वतीने हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

डॉ. सावंत यांची ४० हून अधिक ग्रंथसंपदा असून त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे तसेच विविध साहित्य संस्थांचे मानाचे शेकडो पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्यातील कित्येक प्रस्थापित आणि नवलेखकांच्या पुस्तकांच्या डॉ. सावंत यांनी प्रस्तावना लिहिल्या असून पाठराखणही केली आहे. डॉ. सावंत यांना राज्यभरातील अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले असून, नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा दीड लाखाच्या कै. नरहर कुरुंदकर पुरस्काराने त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

नवलेखकांना खऱ्या अर्थाने प्रेरणा देत डॉ. सावंत यांनी जिल्ह्यात आणि राज्यात शेकडो नवसाहित्यिकांची पुस्तके प्रकाशित करण्यात सहकार्य केले आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणूनही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी राबविलेल्या गुणवत्तापूर्ण आणि पथदर्शी उपक्रमामुळे ते मुख्याध्यापक असलेल्या राजर्षी शाहू विद्यालय आंतरराष्ट्रीय ‘आयएसओ’मानांकन प्राप्त झाले आहे.

शिक्षण, लेखन, साहित्य, संपादन अशा चौफेर क्षेत्रात गुणवत्तापूर्ण दबदबा निर्माण करणाऱ्या डॉ. सावंत यांच्या हीरक महोत्सवी सत्कार समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. सुरेश सावंत हीरक महोत्सव समितीने केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com