‘ते उपाशी झोपत असतील...तर आपल्याला झोप येईल का..?’

nanded news
nanded news

नांदेड : लॉकडाउनमुळे अनेकांवर घरात चूल पेटत नसल्याने उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. शासनाच्या राशन मिळण्याच्या घोषणा कागदावरच आहेत. परिणामी, अशा लोकांची भयावह स्थिती शहरातील कमल फाऊंडेशनमधील युवा सदस्यांना पाहावली नाही.

अमरदिप गोधने, बुध्दभुषण सोनसळे, महेश गुपीले, घनश्याम जाधव, सुनील शिंदे, विक्की जैन, पवन सरोदे, बालाप्रसाद राठोड, अनिल ढेंबरे, साई कदम हे युवक ६६ दिवसांपासून धान्य, किराणा आणि अन्नाचं वाटप करत आहेत.  जवळ होतं नव्हतं सगळं त्यांनी पणाला लावलंय...पण तरी बरच करायचं बाकी राहिल्याची खंत त्यांना बैचेन करत आहे.    

काय सांगतात लढवय्ये युवक
झोपडीत राहणारी ती बाई ‘भाऊ, दोन लेकरं हाईत घरी...खायला काय नाही, जरा जास्त देता का..?’ असं म्हणताना किती हतबल दिसत होती. राशन कार्डवर नाव नसलेले भिक्षुक लोक ‘चूल पेटत नाही ओ भाऊ...लोकं काम देत नाहीत, राशन मिळत नाही...तुम्हीच सांगा काय करू..!’ असं म्हणून त्यांच्या केविलवाण्या लेकरांना आमच्या समोर घेऊन आल्यानंतर आम्ही स्वस्थ कसे बसणार..?  पालावरच्या वस्तीत शहरातील वेगवेगळ्या भागातील, झोपड्यासाठी एक महिन्याचा किराणा व राशन वाटप करू आल्यानंतर असे अनेक अस्वस्थ प्रश्न घेऊन आम्ही बैचेन झालो होतो. 

आमच्या पगारातून आणि काही मित्रांच्या मदतीतून आजपर्यंत झेपेल तेवढी जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक लोक हक्कानं गाऱ्हाणे सांगत आहेत. आम्ही प्रशासन नाही...ना उद्योजक...ना श्रीमंत व्यापारी..! तरीही या महामारीत भूकमारी सोबत आमचा संघर्ष सुरुच आहे..! या लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये आम्ही मात्र वाड्या वस्त्यांवर, रेल्वे स्थानक परीसर, बसस्थानक, बंदाघाट परिसर, तसेच शहरातील प्रवासी, निराधार, मनोरुग्ण, दिव्यांग, यांच्याकडे जातोय, झोपडपट्ट्यात जाऊन लोकांना सांगतोय, जी शक्य असेल ती मदत करतोय. 

घरातील आमचे सदस्य तणावात, तरीही...
आमच्या प्रत्येकाच्या घरचे तणावात असतात...आम्हाला काही होणार तर नाही ना..! या चिंतेने हे काम बंद करावं म्हणून त्रासिक विनवण्या करतात...अनेकदा घरगुती खटके उडतात...अनेकदा त्यांचं पटतही...पण कुठून तरी फोन येतो...जो अशा कठीण काळात घरी बसण्याला परवानगी देत नाही...लोकांना गरज असताना आपण स्वतःमध्ये असं गुरफटून राहणं मनाला पटत नाही...आणि सुरू होते ऊन, वाऱ्यातली मोहीम...सकाळी सुरू झालेली ही मोहीम चालत राहते सूर्य आडोश्याला जाईपर्यंत..! 

दात्यांना आवाहन...तुम्ही आम्हाला समजून घ्या..!​
आमचा उत्साह कमी होणार नाही...पण ताकत कमी झालीय..! अशा प्रत्येक माणसाला अन्न पोहचवण्यासाठी आम्ही वाटेल तो संघर्ष करू...पण आमच्या जवळ भूकमारी सोबत लढण्यासाठी लागणारी रसद संपलीय...जे करता येईल ते केलं...! आता तुमच्या मदतीची अपेक्षा आहे..! तुम्ही आम्हाला मदत केली.. तर आम्ही त्यांना मदत करु...जे वाट पाहतायेत माणुसकीचा दोन घासासाठी...! आम्ही त्यांना समजून घेतोय...तुम्ही आम्हाला समजून घ्या..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com