Video : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्या, छावा संघटनेची मागणी 

File photo
File photo

नांदेड : बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी जिल्हाभरातून शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतरही कृषी विभागाने काहीच पावले उचलली नाही. त्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, कृषी विभागातील दोषी अकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी शुक्रवारी (ता.१०) जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये छावा संघटनेने ठिय्या आंदोलन केले. 

जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कंपन्यांकडून सोयाबिनची बोगस बियाणे विक्री झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असून, बहुसंख्य शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येवून ठेपली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु, कृषी विभागाच्या वतीने अद्यापही ठोस पावले उचलली जात नाही. कृषी विभाग पंचनामे केल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र कुठलीही मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने शेतकरी हैराण झालेला आहे.  

तीव्र आंदोलन करणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान देवून दुबार पेरणीसाठी मदत करावी, या प्रमुख मागणीसाठी छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख दशरथ पाटील कपाटे यांच्या नेतृत्वाखाली  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात कृषी विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ घरी पाठवावे, अशी मागणी करण्यात आली. येत्या आठ दिवसात जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही तर यापुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख दशरथ पाटील कपाटे यांनी दिला आहे. यावेळी छावाचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, तानाजी पाटील, सत्तार पठाण, गुरु पाटील, दीपक तुडमे, सचिन कंकाळ, गोविंद कपाटे, खंडू सावळे, अनिल धुमाळ आदी उपस्थित होते.  

विक्रेत्यांचा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय

कंपनी मार्फत वितरकाकडे बोगस बियाणे आल्याची जिल्ह्यातील वितरकांना कल्पना नव्हती का? शेतकरी आणि वितरक यांच्यात नेहमीच चांगले संबंध राहिले आहे. एखादा शेतकरी कृषी दुकानदार अथवा फर्टिलायझर्सच्या दुकानदाराकडे एकदा जोडला गेला तर तो शेतकरी इतर कुठल्याही दुकानदाराकडून शेती साहित्य खरेदी करत नाही. ही वस्तुस्थिती असताना बियाणे वितरकांनी शेतकऱ्यांना का अंधारत ठेवले? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे बियाणे वितरकांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी देखील तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com