लगीनघाई वधू पित्यासाठी वरदान तर व्यावसायिकांसाठी अवघड...

file photo
file photo

नांदेड - कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले असून गेल्या दीड महिन्यात अनेकांना लग्नसोहळ्यांसह इतर कार्यक्रम रद्द करावे लागले तर काहींना पुढे ढकलावे लागले. त्याचबरोबर काहींनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत मोजक्याच पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळे व इतर कार्यक्रम उरकले. मात्र, लॉकडाऊनच्या या काळात लगीनघाई वधू पित्यासाठी वरदान ठरत असल्याची तर त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांसाठी अवघड होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र या लॉकडाउनमुळे छोटे मोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यात प्रामुख्याने विवाह सोहळे बंद असल्याने यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. तरी पण ही बाब आजच्या घडीला मेटाकुटीला आलेल्या वधू पित्यांसाठी वरदान ठरत असून ‘कही खुशीं, कही गम’ असे वातावरण विशेषतः ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.

सर्वांचेच जनजीवन ठप्प 
लग्न समारंभ म्हणजे सर्व व्यावसायिकांची चांदी ! लग्न दोन कुटंबाचे असते मात्र सर्व लोकांना चार पैसे कमाईचा हा सिझन असतो. यात मंडप, किराणा दुकानदार, स्वयंपाकी, बॅण्ड बाजावाले, कपडा व्यापारी, पत्रिका छपाई, रुखवत, मळवट, हारतुरे वाले, मेकअप, फोटोवाले, भटजी, वाहन, डिजेवाले, धाबे हॉटेलपासून ते गल्लोगल्लीच्या छोट्या व्यापाऱ्यापर्यंत हा सिझन महत्वाचा असतो. पण या वर्षी संपूर्ण जगाला कोरोना या महामारीने जखडून ठेवले आहे. लाखो निरपराध लोकांचे बळी घेणारा कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे. सर्वांचेच जनजीवन ठप्प झाले आहे. भारतातही हीच परिस्थिती आहे.

वधूपक्षाकडील मंडळी अडचणीत
भारतात वेळीच दखल घेऊन लॉकडाउन केल्यामुळे काही प्रमाणात हा संसर्ग रोखण्यात इतर देशांच्या तुलनेत आपण यशस्वी झालो आहोत. संपूर्ण देश लॉकडाउन झाला आहे. यात महाराष्ट्रावरही या बंदीचा आर्थिक परिणाम जाणवत आहे. येथील कारखानदारी, उद्योगधंदे, शेती व्यवसाय हे पूर्ण बंद असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी व कष्टकरी प्रवर्गातील वधूपक्षाकडील मंडळी ही खऱ्या खुऱ्या अडचणीत सापडली होती. 

वर पक्षाकडील मंडळींची समयसूचकता
कोरोना आणि लॉकडाउनवर उपाय शोधत व मनाचा मोठपणा दाखवत वर पक्षाकडील मंडळींनी कोरोनाच्या समयी सूचकता दाखवित साधेपणाने विवाह सोहळे पार पाडण्यासाठी संमती देत एक नवा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. याबद्दल वधूपक्षाच्या मंडळीकडून आमची मोठ लग्न करण्याची हौस राहून गेली पण या संकटकाळात कुठेतरी विवाह आटोपल्याचे समाधानही तितकेच महत्वाचे आहे, असे उ्दगार अनेकांच्या तोंडून सहज निघताना अनुभवायला येत आहेत. याचवेळी वधू पक्षासह वर पक्षाकडील मंडळीही लग्न संभारंभावर आधारीत व्यावसायिकांचा व्यवसाय यावर्षी अडचणीत आल्याची प्रतिक्रीया नोंदवित आहेत आणि कोरोनाचे संकट लवकरात लवकर परत जावे, अशी प्रार्थना करत आहेत.

बहिणींचा विवाह सोहळा साधेपणाने
रविवारी (ता. १७) नांदेड जिल्ह्यातील कामारी (ता. हिमायतनगर) येथे देवराये - पाटील परिवारातील दोन सख्या चुलत बहिणींचे विवाह सोहळे अत्यंत साध्या पद्धतीने पार पडले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मोजक्या पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी भावी वैवाहिक आयुष्यासाठी वधू-वरांना शुभार्शिवाद दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com