Video : कोरोनाच्या काळात काय आहे रानभाज्यांचे महत्त्व? वाचा सविस्तर

Nanded News
Nanded News

नांदेड : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या आपण खातो.  पण बांबूच्या कोवळ्या पानांची, सराटा, केनपाट, इचका, पिंपळ पान, भुई आवळी या रानभाज्यांचीही भाजी होते, हे माहिती नसते. रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तर काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत.  

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये सोमवारी (ता.१० आॅगस्ट) रानभाजी महोत्सवाचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आदी उपस्थित होते. नवीन पिढीला रानभाज्या समजाव्यात, त्यांचे आरोग्यातील महत्व समजावे यासाठी ऑगस्ट क्रांती आणि जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  

कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. रानभाज्या आयुर्वेदिक औषधाचे काम करतात. जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात यावा, तसेच या महोत्सवातून रानभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा या महोत्सवामागील हेतू आहे.  नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून भाज्या खरेदी करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले. दरम्यान त्यांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देवून त्यांनी रानभाज्यांची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली.  

महोत्सवातील रानभाज्या
या महोत्सवात शेतकरीगट व महिलागटांचा सहभाग आहे. महोत्सवामध्ये उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांमध्ये कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुईआवळी इत्यादी कंदभाज्या व सेंद्रीय हिरव्या भाज्या, फळभाज्या व फुलभाज्या व रानफळांचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे.  

काय आहे रानभाज्यांचे महत्त्व?
रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक असतात. या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. या भाज्या पुर्णपणे नैसर्गिक असल्याने शहरी लोकांमध्ये याबाबत जागृती करणे आवश्यक आहे. यासाठी हा रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले आहे. मानवी आरोग्यासाठी सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नादमध्ये विविध रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे. 

रानभाज्या आरोग्यासाठी लाभदायकच
फास्टफूडच्या जमान्यात युवा पिढीला रानभाज्यांचे महत्व पटवून देण्याची गरज आहे. मानवी आरोग्यासाठी सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. रानातील, जंगलातील व शेतशीवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे, रानफळांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना झाली पाहिजे.  
- डॉ. विपीन ईटनकर, जिल्हाधिकारी नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com