Balochistan
Balochistan

कडव्या मोदींचा बलुचिस्तानात हस्तक्षेप नको

(वाचकांना एक खास विनंती! हा लेख लिहिलेले लेखक माझ्या ई-मेलद्वारा परिचयाचे झाले आहेत. सध्या ते वॉशिंग्टन येथे काम करतात. "बलोच हाल' या वृत्तपत्राचे ते मुख्य संपादकही आहेत. एके काळी ते ज्या पोटतिडिकेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यावर लिहीत; ती पोटतिडीक काहीशी कमी झाली आहे, असे हा लेख वाचून मला वाटते. या लेखातील बरेच मुद्दे मला न पटणारे आहेत व ते वाचून मला आश्‍चर्यही वाटले. पण हा एक वेगळा मतप्रवाहसुद्धा "सकाळ'च्या वाचकांनी वाचावा असे मला वाटल्यामुळे मी हा लेख सादर करीत आहे)

कांहीं दिवसांपूर्वी एका सर्वपक्षीय सभेत मोदींनी सर्वप्रथम बलुचिस्तान प्रश्नाचा उल्लेख केला. ते म्हणाले कीं बलुची लोकांवर जे अत्याचार पाकिस्तानी सेनेने केलेले आहेत त्याचा जाब त्यांना जगाला द्यावाच लागेल. बऱ्याच लोकांना मोदींचे हे निवेदन म्हणजे चुकून बोललेले निवेदन (slip of tongue) वाटले असेल. पण जेंव्हां त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या सभेत बलुचिस्तान व इतर कांहीं विभागांचा पुन्हा उल्लेख केला तेंव्हां ते त्यांच्या तोंडातून चुकून बाहेर पडलेले वाक्‍य नव्हते हे उघड झाले.

मोदींचे निवेदन म्हणजे असे उडत-उडत केलेले विधान नव्हते, तर भारताच्या नव्या ध्येयधोरणाची जगाला करून दिलेली ओळख होती! या नव्या धोरणामुळे पाकिस्तान-भारत या देशांमधील तणाव वाढणार आहे व एक तऱ्हेच्या नव्या प्रादेशिक अस्थिरतेची ती नांदीही असेल! पाकिस्तानची प्रतिक्रिया अपेक्षित अशीच होती. रॉ ही भारतीय गुप्तहेर संघटना बलुचिस्तानमध्ये कशी लुडबूड करत आहे हेच या वक्तव्याने सिद्ध झाले असे त्यांनी जाहीर करून टाकले. पण बहुसंख्य बलुची नेत्यांनी भारताच्या पंतप्रधानांच्या उद्गारांचे स्वागत केले. बलुची लोकांनी आपले आभार मानले हे मोदींचे विधान खरेच होते. कारण बलुची नेत्यांनी त्यांचे आभार मानलेच होते!

ही आजची परिस्थिती कशी उद्भवली?
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा अंतर्गत मामला आहे, असे आग्रहाने प्रतिपादन करणाऱ्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाने ही आजची परिस्थिती कशी उद्भवली याचा विचार केला पाहिजे. बलुचिस्तानची सरहद्द पश्‍चिमेला इराणला व उत्तरेला अफगाणिस्तानला भिडलेली आहे. त्या सरहद्दीवरील भागात आज तालिबान, इसिस व मुस्लिम उपजातीची तत्सम इतरही टोळकी जमा होत आहेत आणि त्यांची पाकिस्तान, इराण व अफगाणिस्तानवर हल्ला करण्याची तयारी चालू आहे. बलुची सशस्त्र टोळक्‍यांची धार्मिक विचारप्रणाली या अतिरेकी टोळक्‍यांच्या विचारप्रणालीपेक्षा खूपच भिन्न असली; तरी सरकारी अधिकाऱ्यांवर किंवा सरकारी मालमतेवर, कारखान्यांवर किंवा लष्करी तळांवर हल्ले करण्याला ते अग्रक्रम देतात!

पाकिस्तानी सरकारने एक माजी मुख्यमंत्री असलेले डॉ. अब्दुल अलिक बलोच यांचा अपवाद सोडल्यास हद्दपार असलेल्या कुठल्याही बलुची नेत्याशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केलेला नाही. डॉ. बलोच यांनी सध्या युरोपमध्ये स्थायिक असलेल्या, अशा हद्दपार असलेल्या कलातच्या खानसाहेबांबरोबर ब बरहमदाग बुगती यांच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे बुगती यांनी सरकारबरोबर वाटाघाटी करण्याची तयारी दाखविली, पण पाकिस्तानी सरकारला बुगती यांच्या बांधिलकीबद्दल वा वचनपूर्तीबद्दल खात्री नव्हती. कारण बुगती आपल्या भाषणांतून त्याच वेळी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्याचे प्रयत्न करत होते. याचा अर्थ असाच होता कीं त्यांनी अद्याप स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी सोडून दिलेली नव्हती! एका बाजूने बंडखोर सतत सरकारी व लष्करी ठाण्यांवर हल्ले करून सैनिकांना ठार करत असल्यामुळे बलुचिस्तानमधील हाताबाहेर चाललेली परिस्थिती पाहून पाकिस्तानी लष्कराचा केवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास होत असेल हे सहज समजू शकते! तरीही फ्रंटियर कोअरने पुन्हा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वातंत्र्यदिन नेहमीप्रमाणे साजरा करायची सक्ती केली!

बलुची लोकांच्या मनावर व शरीरांवर झालेल्या जखमा बऱ्या करण्याकडे लक्ष न देता सरकार पाकिस्तानी राष्ट्रवादाला पराकोटीचे समर्थन व प्रोत्साहन देत होते. म्हणूनच गृहमंत्री सरफराज बुगती यांच्यासारखे नेते आपला बराच वेळ इतरांच्या देशभक्तीबद्दल शंका घेत बसतात व आपण कसे इतरांपेक्षा जास्त उच्च दर्जाचे पाकिस्तानी आहोत अशी स्वत:ची प्रतिमा रंगविण्यातच वेळ खराब करतात! खरे तर अशा तऱ्हेची वागणूक म्हणजे नागरिकांमध्ये देशभक्तीचे रोपण करण्याबाबतचे चुकीचे डावपेचच आहेत.

1990 च्या दशकात आम्ही लहानाचे मोठे असे नाहीं झालो! तो काळ खूपच वेगळा होता आणि गृहमंत्रालयाकडून आमच्यावर देशभक्तीची कधीच सक्ती केली जात नव्हती! कुठल्याही प्रकारच्या सक्तीशिवाय आम्ही सारे अतीशय आनंदाने स्वातंत्र्यदिन समारंभांत भाग घेऊन तो साजरा करायचो.

टोकाचे राष्ट्रप्रेम व माझे राष्ट्रप्रेमच सवोच्च प्रतीचे या तऱ्हेचा दुरभिमान हे संयुक्तिक विचारसरणीचे सगळ्यात मोठे शत्रू असतात. त्यांना आजिबात प्रोत्साहन न देता उखडून टाकले कीं समजूतदार मने व विचारपूर्वक केलेली निवेदने पुढे येऊ शकतात व त्यांच्या विचारमंथनातून राजकीय वाटाघाटी होत रहातात! आपण वास्तवाचे भान असलेले व्यवहारी व्हायला हवे! पाकिस्तानी सरकार व असंतुष्ट बलुची नेते एका बैठकीत आपले मतभेद दूर करूच शकणार नाहींत. दोन्ही बाजूंचे समाधान करू शकणारा सुवर्णमध्य सापडेपर्यंत त्यांना वारंवार वाटघाटी कराव्याच लागतील. यासाठी कांहीं महिनेच काय कांहीं वर्षेही लागतील.

बलुची नेत्यांनी मानलेले मोदींचे आभार!
दरम्यान कांहीं बलुची नेत्यांनी घाईघाईत मोदींचे आभार मानणे हे महदाश्‍चर्यच म्हटले पाहिजे. कारण आपल्या चळवळीचा उद्देश काय व ती कशी चालली आहे याबद्दल हे नेते आणखीच गोंधळ निर्माण करत आहेत. बलुची लोकांच्या अनेक खऱ्याखुऱ्या तक्रारी आहेत. पण मोदींसारख्या गुजरातमधील हत्याकांडाला जबाबदार असलेल्या[1] व सध्या काश्‍मीरमध्ये निदर्शकांविरुद्ध हिंसाचार करणाऱ्या माणसाचे आभार मानणे कसे स्वीकारार्ह असू शकेल? स्वत:च जुलुमाची शिकार असलेल्या बलुची जनतेने जुलमी नेत्याची निर्भत्सना करायला नको का? बलुची जनता स्वत:ला निधर्मी मानते तर मोदी निधर्मी मूल्यांविरुद्ध व भाषणस्वातंत्र्याच्या विरुद्ध उभे आहेत असेच दिसते. ते असहिष्णू व कडव्या असलेल्या हिंदू धर्माच्या उग्रवादी पक्षाचे समर्थक आहेत[2].

आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्यासाठी बलुची नेते अतिशय निकराने प्रयत्न करत होते. कधी तात्पुरते वैयक्तिक समर्थक मिळवू पहात होते. हे समर्थक त्यांच्या टोकाच्या पुराणमतवादांसाठी कुप्रसिद्ध होते.
मोदी यांचे आभार मानणाऱ्या नेत्यांनी अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अति-उजव्या दक्षिणपंथी (rightists) ज्येष्ठ सदस्यांचेही उदारपणे कौतुक केले आहे. यात लुई गोमर्ट (Louie Gohmert) यांचाही समावेश आहे. ते डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक आहेत. धर्मनिरपेक्षतेवर व लोकशाहीवर श्रद्धा असल्याचा दावा करणाऱ्या बलुची लोकांसाठी असे करणे हिताचे नाही.

जबाबदार आणि पारदर्शी नेतृत्वाच्या अभावामुळे बलुचिस्तानातील राष्ट्रवाद्यांची चळवळ रुळांवरून घसरली आहे व विकृत, आकारहीन बनली आहे. अत्याचारग्रस्त व रंजल्या-गांजल्या लोकांनी अन्यायाविरुद्ध सुरू केलेली ही चळवळ हळु-हळू अतिशय क्रूर व बेजबाबदार बनत चालली आहे. बलुचिस्तानात आलेल्या उपऱ्या लोकांवर हल्ले चढविल्याबद्दल बलुचिस्तानातील सशस्त्र गटांवर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांद्वारे प्रचंड टीका तर झालीच पण अनेक बलुची लोकांचीसुद्धा अनेकदा ते सरकारी हेर म्हणून, सरकारशी सहकार्य केल्याबद्दल व गद्दारीबद्दल मोठ्या प्रमाणावर हत्या केली त्यांनी असली तरी अद्यापपर्यंत तरी त्यांना शिक्षा झालेली नाहीं!

आपणच बलिचिस्तानचे कार्यशील व निष्ठावंत भूमिपुत्र आहोत हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात बलुची लोक एकमेकांची हत्या करण्यात गुंतले आहेत व त्यामुळे तेथे यादवी युद्ध सुरू झाले आहे. सरकार या जहालपंथी बलुची व आणि नेमस्त, मवाळपंथी बलुची यांच्यामधील अशा आपसातील कलहात हस्तक्षेप करत नाही. कारण त्यांना कमकुवत आणि विभाजित, दुही माजलेल्या बलुची चळवळीवर नियंत्रण करणे सोपे वाटते. कुठल्याही वाटाघाटींच्या अभावामुळे बलुचिस्तान आणि इस्लामाबाद यांना पूर्णपणे भिन्न आणि धोकादायक दिशांना ढकलले गेले आहे. त्यांच्या चुकीच्या निर्णयांचे व कृतींचे अतीशय प्रलयंकारी परिणाम दोन्ही बाजूंच्या सामान्य बलुची लोकांना भोगावे लागतील हे दोन्ही बाजूंनी लक्षात ठेवायला हवे.

गेल्या दशकात बलुचिस्तानमध्ये झालेले अत्याचार आपण पाहिले आहेतच. आता भारताने जर बलुची स्वातंत्र्यसैनिकांना सक्रिय, अधिकृत समर्थन दिले तर काय हाहाकार माजेल याची कल्पनाच करवत नाहीं! बलुचिस्तानने खूप हिंसा पाहिली आहे आणि आम्ही अशा तऱ्हेच्या हिंसेचा शेवट करू इच्छितो.

सर्वात आधी बलुचिस्तानच्या समस्या सोडविण्यासाठी मोदींना भारतातर्फे समर्थन देण्यासाठी प्रवृत्त करण्याची परिस्थिती इस्लामाबादने निर्माणच करायला नको होती! आता मोदींनी ते देऊ केले आहे. आता पाकिस्तानने विनाविलंब पुढील कृती केली पाहिजे. एक दशकाहून अधिक काळ पाकिस्तानी सरकारने लष्करी उपायांचे प्रयोग केले. ते विफल ठरले आहेत. आता राजकीय पद्धतीने हा प्रश्न सोडविण्याची वेळ आली आहे. ही पद्धत वेळकाढू व वैफल्यग्रस्त करणारी असली तरी तिचाच उपयोग बलुचिस्तानमधील परिस्थितीचे नव्याने मूल्यमापन करण्यासाठी केला गेला पाहिजे!

बलुची जनतेला रॉ ही भारताची गुप्तहेर संघटना चिथावण्या देऊन कश्‍या अडचणी उभ्या करत आहे हे सांगण्यात पाकिस्तानी केंद्रसरकारने वेळ वाया घालवण्याऐवजी त्याने बलुचिस्तानातील तणाव कसा कमी करता येईल इकडे आपले लक्ष केंद्रित करून बलुची नेत्यांना पुन्हा वाटाघाटीसाठी एकत्र आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत!

श्री. मलिक सिराज अकबर यांचा हा लेख सर्वप्रथम डॉन या कराचीहून प्रसिद्ध होणऱ्या दैनिकात ऑगस्ट रोजी Why Modi's statements should be the least of our worries on Balochistan या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला व तो मी डॉनच्या संमतीने प्रकाशित करीत आहे. दुवा आहे: dawn.com/news/1278370/why-modis-statements-should-be-the-least-of-our-worries-on-balochistan
मी या आधीही अकबर यांच्या लेखांचे अनुवाद पैलतीरवर प्रसिद्ध केलेले आहेत व त्यातील कांहीं शंकांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरेही दिली होती. त्यांची तेंव्हांची व आताची मते बरीच वेगळी झाल्यासारखे मला वाटले.

टिपा:
[1] गुजरातमधील दंगलींना जबादार आहेत गोध्रा येथे कारसेवक बसलेल्या नेमक्‍या तीन डब्यांना कुलुपे लावून ते तीन डबे ज्यांनी पेटवून दिले ते लोक. 90 च्या दशकांत मुंबईतील बॉंबहल्ल्यानंतर जशी दंगल मुंबईत पेटली तशीच या निंदनीय कृत्यामुळे गुजरातमध्ये पेटली.
[2] गुजरातमधील या दंगलीवर Role of the Government in controlling violence या शीर्षकाखाली , शब्दांचा एक विस्तृत लेख वाचनात आला. दुवा आहे:
gujaratriots.com/index.php/2008/05/role-of-the-government-in-controlling-violence/
कुठल्याही पक्षाशी बांधिलकी नसलेल्या व नामवंत वृत्तपत्रांतील/ नियलकालिकांतील अनेक दुवेही या लेखाच्या लेखकाने दिले आहेत. ते सर्वच वाचनीय आहेत. त्यांवर एक वेगळाच लेख लिहायला हवा! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com