18 हजार लोक कोल्हापुरात ; लक्ष ठेवायचे कसे?

 18 thousand people in Kolhapur; How to keep an eye?
18 thousand people in Kolhapur; How to keep an eye?

कोल्हापूर  ः  लॉकडाउनमुळे ठिकठिकाणी अडकलेले लोक कोल्हापुरात येत आहेत. आलेल्या प्रत्येकावर लक्ष ठेवण्याच्या सूचना असल्या तरी प्रत्येकावर लक्ष ठेवायचे कसे, हा मुद्दा गंभीर वळणावर आला आहे.

कारण आजअखेर कोल्हापुरात 18 हजार लोक अधिकृत परवाना घेऊन आले आहेत. त्यातले काही क्वारंटाईनमध्ये आहेत. बहुतेक जणांना सात दिवस घराबाहेर पडायचे नाही, या अटीवर जिल्ह्यात प्रवेश दिला आहे. पण, पुढे दिवसेंदिवस रोज हजाराच्या पटीत लोक बाहेरून येणार आहेत. त्यांच्यावर लक्ष कसे ठेवणार, हाच प्रश्‍न आहे. 

यासाठी आज महापालिकेने चार विभागीय कार्यालयांतर्गत चार नोडल ऑफिसरांची नियुक्ती केली. त्यांनी शहरात प्रवेश केलेल्या प्रत्येकावर लक्ष ठेवायचे आहे. किंबहुना या प्रवेश केलेल्यांना क्वारंटाईन करायचे, होम क्वारंटाईन करायचे, की उपचारांसाठी "सीपीआर'मध्ये पाठवायचे, हे या नोडल ऑफिसरांनी ठरवायचे आहे. आणि त्यासाठी नाक्‍यावरील आरोग्य पथकाने केलेल्या थर्मल टेस्टचा आधार महत्त्वाचा मानला जाणार आहे. 

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या लोकांकडून आपल्या गावी जाण्यासाठी ऑनलाईन परवान्याचा अवलंब सुरू झाला आहे. लोक रीतसर परवाने घेऊन येत आहेत. पण, तत्पूर्वीची वैयक्तिक तपासणी, बी. पी. तपासणी व थर्मल टेस्ट सर्दी-खोकला, घशात खवखव आहे का? अशी विचारणा करून केली आहे. सर्दी-पडसे अजिबात नाही, घसाही खवखवत नाही हे प्रत्येकाचे उत्तर आहे. आणि त्याला लगेच वैयक्तिक दाखला द्यायची पद्धत आहे. या दाखल्यावर तो दुसऱ्या गावी जाऊ शकतो. त्यामुळे असे दाखले घेण्यासाठी रांग आहे. आणि प्रत्येकाची खोलात जाऊन तपासणी केवळ अशक्‍य आहे. 
या वातावरणात अशाच पद्धतीने वैयक्तिक दाखले व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना घेऊन लोक मोठ्या संख्येने कोल्हापुरात येत आहेत. ते आले की नाक्‍यावर त्यांची थर्मल टेस्ट केली जाते. त्यांचे टेंपरेचर 99 च्या आत असले की त्यांना प्रवेश दिला जातो. सात दिवस घरातच क्वारंटाइन करण्याचा सल्ला दिला जातो. पण, येथूनच खरा प्रश्‍न निर्माण होतो. हे बाहेरून आलेले लोक क्वारंटाइनची अंमलबजावणी करतात की नाही, हे पाहणे केवळ अशक्‍य आहे. आणि यातूनच संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. 
मुळात कोल्हापूरची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार पाच लाख 47 हजार आहे. गेल्या नऊ वर्षांत त्यात आणखी काही लाखांची भर पडली आहे. त्यात आता बाहेरून 70 ते 80 हजार लोक येतील, अशी शक्‍यता आहे. कोल्हापूरचा विस्तार लांबवर झाला आहे. अशा परिस्थितीत बाहेरून आलेल्या प्रत्येकावर लक्ष ठेवणे केवळ अशक्‍य आहे. आणि कोरोनाच्या संसर्गाची भीती आणखी गडद होत आहे. 


बाहेरून येणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी संजय सरनाईक, चेतन कोडे, अवधूत कुंभार, संजय भोसले या चार नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकांचीही मदत घेतली जाईल. यासाठी एक ऍप तयार केले आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकावर लक्ष ठेवावेच लागेल. 
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com