मुलांच्या मानसिकतेवर कोरोनाचा असा होतोय परिणाम 

corona effect on children
corona effect on children

इस्लामपूर : मागील वर्षातील सांगली जिल्ह्यातील महापूर आणि सध्याच्या कोरोनाची अनिश्चित परिस्थिती याचा सर्वाधिक मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील ‘शुश्रुषा’ सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेच्या मानसतज्ज्ञांनी सांगली जिल्ह्यातील पंधरा वर्षांपर्यतच्या एकूण ८८९२ मुला-मुलींचा मानसशास्त्रीय अभ्यास व सर्वेक्षण केले आहे. यातील तीव्र स्वरूपाच्या मानसिक, भावनिक, वर्तणूक, शैक्षणिक समस्या असणाऱ्या मुलांमधील विविध मानसिक व मनोसामाजिक लक्षणांचा शोध घेतला असता ८५ टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा, ५७ टक्के राग व अती संताप, ५२ टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी तर ५१ टक्के मुलांमध्ये सर्वाधिक अतीचंचलतेचे प्रमाण असल्याचे दिसून आले असल्याची माहिती ‘शुश्रुषा’ संस्थेचे अध्यक्ष मानसतज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिली.


या संशोधनात्मक सर्वेक्षणाबाबत माहिती देताना मानसतज्ज्ञ पाटील म्हणाले, "आजच्या समाजातील अनिश्चिततेचा कुटुबातील सर्व घटकाप्रमाणे मुलांच्या वर्तनावरही विपरीत परिणाम झाला आहे. सर्वेक्षणामध्ये चिकित्सालयिन, शालेय, बाल मानसशास्त्रतज्ञ अशा तज्ञ व प्रशिक्षित २५ मानस तज्ज्ञांनी सहभाग घेतला. यामध्ये सहभागी असणाऱ्या क्रांती गोंधळी,अभिजित वाटेगावकर,अक्षय साळुंखे, शैलजा पाटील, जस्मिन मुल्ला, तेजस्विनी साळुंखे, तेजस्विनी पाटील, रब्बना आंबेकरी, पूनम पाटील, अश्विनी पाटील, ज्योती महाडिक, रोहित पाटोळे, संदीप जाधव, ईशा शहा या तज्ज्ञांनी ९०८५ कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पालक व मुलांशी संवाद साधला. त्यात मुलांमध्ये अकारण भीती, वारंवार रडणे, कमी झोप, मुलामध्ये न मिसळणे, अंथरूण ओले करणे, अंगठा चोखणे, नखे खाणे, बोलताना अडखळणे, हात पाय थरथरणे, अकारण डोके व पोट दुःखी अशा अनेक भावनिक, मनोशारीरिक तक्रारी बरोबरच चिडचिडेपणा, अती चंचलता, राग व अतीसंताप, एकाग्रतेचा अभाव व लक्षात न राहण्याच्या सर्वाधिक जास्त समस्या दिसून आल्या आहेत. मुलांमधील या भावनिक, वर्तणूक व मनोसामाजिक समस्यांचे योग्य वेळी शास्त्रीय निराकरण न झालेस त्यांच्या मानसिकते बरोबरच शिक्षण, आरोग्य व समाज वर्तनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता महाराष्ट्रातील ज्येष्ठ मानसतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

लवकरच ‘शुश्रुषा’ या बाबतचा अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर करणार असून भक्कम उपायासाठी शास्त्रीय प्रकल्प हाती घेणार आहे. सध्या  मुलं व पालकांना मानसिक आधार देण्यासाठी जिल्हाधकारी व जिल्हा शल्य चिकत्सक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली २४ तास मोफत हेल्पलाईन कार्यरत आहे. 


"मुलांच्या विकासात मानसिक आरोग्याला सर्वाधिक महत्त्व आहे. पालकांनी मुलांच्या वर्तन व भावनिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. अंधश्रध्देच्या आहारी न जाता योग्य वेळी मानसतज्ञाची मदत घ्यावी."
-प्रा. डॉ.भास्कर शेजवळ, मानसशास्त्र विभाग प्रमुख,
 सावित्रबार्इ फुले विद्यापीठ पुणे.

"मुलं वरकरणी हसून खेळून वागत असली तरी त्यांच्या मनावर काय परिणाम झाला आहे. हे शारीरिक अस्वस्थतेतून दिसून येत असतं. आपत्तींमुळे भीती, असुरक्षितता, अगतिकता अशा भावना मनात निर्माण होतात. या भावना मुलं शब्दातून, बोलण्यातून व्यक्त करतीलच असं नाही. या भावना विविध शारीरिक कृतीतून व्यक्त होतो. त्यामुळेच मुलांच्या मानसिकतेकडे लक्ष देण्याची गरज आहे."

-डॉ. श्रुती पानसे, प्रसिद्ध लेखिका व मानसतज्ञ

शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलांच्या मानसिक व भावनिक विकासाला अधिक महत्व द्यायला हवे, ऑनलाईन शिक्षणातून मुलांच्या डोक्यात केवळ माहितीचा साठा वाढवू नये, कुटुंब व शाळेमध्ये मुलांचे भावनिक विश्व जपल्यास समाजातील  आत्महत्या,निराशा व गुन्हेगारी कमी होईल."                                                      -डॉ. संदीप सिसोदे, अध्यक्ष,राज्य मानसतज्ञ,असोसिएशन


संपादन - धनाजी सुर्वे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com