
गडहिंग्लज : दहावी परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. गडहिंग्लज तालुक्याचा विक्रमी 97.91 टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीपेक्षा यंदाचा निकाल दहा टक्क्यांनी उंचावल्याने तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. आता आव्हान आहे तो प्रवेश प्रक्रियेचा. कोरोना महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्र अजूनही ठप्पच आहे. बारावी निकालानंतरची प्रवेश प्रक्रिया अजूनही गतीमान झालेली नाही. आता दहावीनंतर पुढील वर्गातील प्रवेशासाठीही कोरोनामध्ये विद्यार्थ्यांची सत्त्व परीक्षा राहणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत दहावी व बारावी हे दोन महत्त्वाचे टप्पे मानले जातात. यंदाच्या कोरोनामुळे सारे शैक्षणिक वातावरण अजून शांतच आहे. नवे शैक्षणिक वर्षे ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते सुरूही केले आहे. परंतु, बऱ्याच शाळांचे ऑनलाईन अद्याप "ऑफ'च आहे. अशा परिस्थितीत बारावी आणि दहावी परीक्षेचा निकाल लागला आहे. बारावीनंतर पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना महामारीमुळे ब्रेक लागला आहे. काही महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली असली तरी ती अजून गतीमान झालेली नाही. इतक्यात आता दहावीचा निकाल आज जाहीर झाला. जिथे बारावीनंतर प्रवेशाचा प्रश्न कायम असताना, आता दहावीनंतरची अवस्था काय असणार हे वेगळे सांगायची गरज नाही.
यंदा दहावीचा निकाल चांगला लागला. तालुक्याचा निकाल दहा टक्क्यांनी वाढला आहे. उत्तीर्ण आणि त्यातही विशेष प्रावीण्यमध्ये उत्तीर्ण झालेल्यांची संख्या लक्षवेधी आहे. यामुळे विज्ञान शाखेसाठी झुंबड उडणार यात शंका नाही. विज्ञान प्रवेश समितीने यंदाही अकरावी विज्ञानसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर शाखांसाठीच्या प्रवेशासाठीही हाऊसफुल्ल गर्दी होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये काही वर्षापासून कॉमर्स शाखाही आघाडीवर राहिली आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदविका, आयटीआय, पॅरामेडिकल आदी अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असली तरी अधिकाधिक विद्यार्थी हे पारंपरिक शिक्षण पद्धतीकडे वळणारे असतात. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कोरोनामुळे संभ्रमाचे वातावरण राहणार आहे. कोरोनाचा कालावधी अजूनही सुरूच असल्याने केंद्रीय असो अगर महाविद्यालयीन पातळीवरील प्रवेश प्रक्रिया असो, ती कशी राबवणार याबाबत स्पष्टता नाही. भविष्यात शासनाकडून तशा सूचना येतीलही. तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. दहावीचा खडतर मार्ग यशस्वीपणे पार करूनही त्यांना आता प्रवेशासाठी झगडावे लागणार आहे.
दोन्हींची तयारी...
बारावी परीक्षेनंतर बहुतांश वरिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रवेशाचे लिंक्स दिले आहेत. ऑफलाईनच्या सूचनाच अजून आलेल्या नाहीत. आता दहावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेबाबतही कनिष्ठ महाविद्यालये संभ्रमात असतील. शासनाने प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना लवकर देणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. तरीसुद्धा महाविद्यालयांनी ऑनलाईन आणि ऑफलाईनची तयारी केली आहे. ऑफलाईनची परवानगी मिळालीच तर शासनाकडून काही नियम व अटी जाहीर केल्या जातील. त्यानुसारच प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
सूचना येतील त्यानुसार प्रक्रिया
कोरोनामुळे बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेवर अद्याप सूचना नाहीत. हा प्रश्न तसाच आहे. आता दहावीचा निकाल लागला असला तरी ऑनलाईन की ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया घ्यायची याच्या सूचना शासनाकडून येतील. त्यानुसार प्रक्रिया राबवता येणार आहे. महाविद्यालयाने मात्र दोन्ही प्रक्रियेची तयारी केली आहे.
- डॉ. बी. जे. देसाई, प्र. प्राचार्य, शिवराज महाविद्यालय
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.