गडहिंग्लज : दोन दिवसाच्या सलग जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. यामुळे या नदीवरील निलजी, ऐनापूर व गिजवणे हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. निलजी व ऐनापूर बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. इंचाइंचानेही वाढणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये धास्ती वाढत असून गतवर्षीच्या महापुराची आठवण ताजी होत आहे.
आजरा, आंबोली परिसरात झालेल्या अतिवृष्टीने नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. काल (ता. 7) दिवसभरात झालेल्या पावसाने एका रात्रीत निलजी व ऐनापूर हे दोन बंधारे पाण्याखाली गेले. आज दुपारी गिजवणे बंधारा पाण्याखाली गेला आहे. निलजी बंधाऱ्यावर आलेल्या पाण्यामुळे नूलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने दुंडगे, जरळी, मुगळीमार्गे नूल, हलकर्णी या भागातील नागरिकांना जाण्यास पर्यायी मार्ग आहे. नूलकडून गडहिंग्लजकडे येणारी वाहतूकही याच मार्गेही सुरू झाली आहे. ऐनापूर बंधाऱ्यावरील पाण्यामुळे सरोळी, निंगुडगे, कोवाडे, पेद्रेवाडी भागातील वाहतूक हाजगोळीमार्गे सुरू करण्यात आली आहे. पाटबंधारे खात्यातर्फे प्रत्येक बंधाऱ्यावर फलक लावून बंधाऱ्यावरून वाहत्या पाण्यातून ये-जा न करण्यासंदर्भात आवाहन केले आहे. रोजची पाण्याची पातळीही या खात्याकडून तपासली जात आहे.
दरम्यान, इंचाइंचाने वाढणाऱ्या पाणी पातळीमुळे नागरिकांत आतापासूनच धास्ती निर्माण झाली आहे. या पुरामुळे नागरिकांना गतवर्षीच्या महापुरातील आठवणी ताज्या होताना पहायला मिळत आहे. पूरपातळीच्या आतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. प्रत्येक गावचा सुक्ष्म आराखडा केला असून त्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या आहेत.
हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आजरा, आंबोली परिसरात मुसळधार पाऊस असल्याने पाण्याची पातळी वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार दिनेश पारगे यांनी आज दिवसभरात ऐनापूर, जरळी, निलजी या बंधाऱ्यांना भेट देवून पाहणी केली आहे. ग्रामपंचायतीला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पाणी पातळीतील वाढीचा अंदाज पाहून नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे.
बंधाऱ्यात अडकला बांबूचा बेट
हिरण्यकेशी नदीवरील जरळी बंधाऱ्याच्या दरवाजामध्ये भला मोठा बांबूचा बेट अडकला आहे. नदीकाठावरील हे बेट पाण्याच्या प्रवाहातून वाहून बंधाऱ्याजवळ आला आहे. या बेटामुळे बंधाऱ्याला धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. दरम्यान, तहसीलदार दिनेश पारगे यांनी बंधाऱ्याला दिलेल्या भेटीवेळी संबंधित तलाठ्यांना हा बेट पाण्यातून बाहेर काढण्यासंदर्भात सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.