इचलकरंजीतील पाच हजार कुटुंबे पुन्हा भीतीच्या छायेत 

इचलकरंजीतील पाच हजार कुटुंबे पुन्हा भीतीच्या छायेत 

इचलकरंजी : शहरातील सुमारे पाच हजार कुटुंबे पुन्हा महापुराच्या भीतीच्या छायेखाली आहेत. गेल्या वर्षीच्या महापुराच्या प्रलयातून सावरत असतानाच पुन्हा एकदा ही कुटुंबे अवस्थ होताना दिसत आहेत. गेल्या वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने पूरबाधीत क्षेत्रातील नागरिक आतापासूनच सतर्क झाले आहेत. प्रशासन पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन सुरू झाले आहे. 
गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे वस्त्रनगरीतील मोठा भाग पाण्याखाली गेला होता. गेल्या शंभर वर्षांतील हा सर्वांत मोठा महापूर असल्याचे सांगण्यात आले.

अनेक घरांची पडझड झाली. यंत्रमाग कारखान्यांत पाणी शिरले. त्यामुळे कोट्यवधींचा फटका या उद्योजकांना बसला. अनेकांचे संसार महापुराच्या पाण्यात वाहून गेले. व्यावसायिकांना जबर फटका सहन करावा लागला. या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीतून पूरबाधीत क्षेत्रातील जनजीवन सुरळीत होत असतानाच कोरोनाचे नवे संकट निर्माण झाले आहे. पण, कोरोनापेक्षाही संभाव्य महापुराच्या संकटाने आतापासूनच भीती निर्माण होत आहे. 

गेल्या वर्षीच्या महापुराच्या संकटाने अनेकांना विस्थापित होण्याची वेळ आली. अगदी बड्या राजकीय नेत्यांची घरेही महापुराच्या विळख्यात सापडली होती. या संकटातही "सेंट्रल किचन'चा उपक्रम इचलकरंजीने महाराष्ट्राला दिला. त्यामुळे महापुराच्या काळात हजारो लोक विस्थापित होऊनही त्यांच्या जेवणाचे हाल झाले नाहीत. आता मात्र कोरोनामुळे सर्वच हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा महापूर आला तर काय होणार, अशा भीतीनेच संभाव्य पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांच्या अंगावर काटा येत आहे. 

प्रशासन अद्याप कोरोनाचे संकट दूर करण्याच्या कामात व्यस्त आहे. सोबत संभाव्य महापुराच्या नियोजनाबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. पण, अद्याप त्याला गती आलेली नाही. पुढील काही दिवसांत पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतराबाबत सूचना दिल्या जाण्याची शक्‍यता आहे. काही नागरिकांनी आतापासूनच सतर्कता दाखवत महापूर आल्यास तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू केले आहे. गेल्या वर्षी किमती वस्तू महापुराच्या पाण्यात भिजल्या होत्या. यंदा मात्र नागरिक आतापासूनच दक्ष झाले आहेत. पण, महापुराची भीती मात्र मनात कायम आहे. 

गेल्या वर्षी 81 फूट... यंदा किती? 
गेल्या वर्षी पंचगंगा नदीला आलेल्या महापुराने विक्रमी 81 फुटांची पाण्याची पातळी गाठली होती. त्यामुळे इचलकरंजीतील मोठे क्षेत्र महापुराच्या पाण्याखाली गेले होते. यंदा धरणांतील सध्या असलेला साठा पाहता महापूर येणार, हे निश्‍चित मानले जात आहे. त्यामुळे यावर्षी पंचगंगा नदीतील महापुराच्या पाण्याची पातळी किती फुटांपर्यंत जाईल, याबाबत आतापासूनच तर्क-वितर्क केले जात आहेत. 

धोकादायक इमारतींना नोटिसा 
शहरात अनेक धोकादायक इमारती आहेत. पालिका प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही संबंधितांना नोटिसा देण्याचे काम सुरू करण्यात आले. गेल्या वर्षी 74 जणांना नोटिसा दिल्या होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com