चंदगड : गेल्या महिन्यात वादळी पावसाने जमिनीवर आडव्या झालेल्या उसावर आता विविध वन्यप्राणी ताव मारत आहेत. पुराने सुरळीमध्ये पाणी जाऊन वाडी कुजली आहेत. पडलेला ऊस उभा करायचा म्हटले, तर तो मोडत आहे. घटप्रभा नदीकाठच्या कानूर, पुंद्रा, कुरणी, बुझवडे, गवसे, इब्राहिमपूर परिसरांतील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. सलग दोन वर्षे नैसर्गिक संकटाने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला शासनाने शंभर टक्के भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
कोकण सीमेवरील या परिसरात मोठा पाऊस असतो. या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोराच्या वादळासह पाऊस झाला. तत्पूर्वी पावसाने जमीन ओलसर झाल्याने मुळे सैल झाली होती. त्यामुळे वाढलेला ऊस वाऱ्याच्या झोताने जमिनीवर आडवा झाला. त्यानंतर सलग तीन दिवस नदीचे पुराचे पाणी शेतात साचून होते. उसाच्या सुरळीमध्ये पाणी गेल्यामुळे पाने कुजली आहेत. पडलेला ऊस उभा करण्याचा प्रयत्न केला असता तो मोडत असल्याने आहे त्याच स्थितीत ठेवावा लागला आहे; परंतु त्यावरही वन्यप्राण्यांचे संकट आहे.
गवे, रान डुक्कर, वानरे, खारुताई आणि उंदीर त्यावर ताव मारत आहेत. या प्राण्यांना पडलेला ऊस खाणे सोयीचे ठरत आहे. कुरणी येथील कृष्णा सतबा पाटील यांचा सुमारे दहा एकरांतील ऊस भुईसपाट झाला आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रातील पीक वाया जाणार असल्याने पाटील यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नदीकाठच्या सर्वच ऊस पिकाची ही अवस्था आहे. कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे झाले आहेत; परंतु आतापर्यंतचा अनुभव विचारात घेता मिळणारी भरपाई अत्यल्प आहे. शासनाला खरोखरच दिलासा द्यायचा असेल, तर शंभर टक्के भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शंभर टक्के भरपाई मिळावी
दहा एकरांतील उसाचे नुकसान झाले आहे. पीक कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न आहे. गतवर्षी महापुराने आणि या वर्षी वादळाने दगा दिला. शंभर टक्के भरपाई मिळाली तरच या अरिष्टातून बाहेर पडणे शक्य आहे.
- कृष्णा पाटील, नुकसानग्रस्त शेतकरी, कुरणी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.