
महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेतर्फे कामबंद आंदोलन सुरू आहे
उत्तूर : आमचे सरण रचायची वेळ आली तरी तुमचे धरण पूर्ण होईना, अजून कसली वाट पाहता..?, असा सवाल माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी शासनाचे अधिकारी व मंत्र्यांना केला. आंबेओहोळ धरणावर सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना त्यांनी मत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेतर्फे कामबंद आंदोलन सुरू आहे. शिवाजी गुरव यांनी स्वागत केले.
श्री. शिंदे म्हणाले, की आंबेओहळ धरणग्रस्त आपल्या प्रश्नांसाठी 25 वर्षे लढा देत आहेत, मात्र प्रश्न सुटले नाहीत. आता मात्र ठोस निर्णय झाल्याशिवाय धरणाचे काम सुरू करू दिले जाणार नाही. मला कोणत्याही निवडणुकीला आता उभे राहायची नाही, तरीही मी धरणग्रस्तांबरोबर आहे. नुकसान भरपाई मिळाली नाही, घराला घर मिळाले नाही, शेताला शेत मिळाले नाही, सर्व मागण्या व पुनर्वसनाचा प्रश्न सुटला पाहिजे.
हे पण वाचा - शेअर मार्केट गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल पैसे गुंतवूया म्हणत साडेअकरा लाखाला घातला गंडा
या वेळी पंचायत समितीचे सदस्य बाळेश नाईक उपस्थित होते.
संतोष बेलवाडे, सचिन पावले, महादेव खाडे, नामदेव पोटे, बजरंग पुंडपळ, श्रीराम चौगुले, मधुकर पोटे, करपेवाडी, होन्याळी, आरदाळ येथील धरणग्रस्त उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे