सेंद्रीय शेती काळाची गरज 

The need for organic farming time
The need for organic farming time

कोल्हापूर : सेंद्रीय शेतीमुळे खर्च वाढतो, उत्पादन घटते अशा चुकीच्या समजुती शेतकऱ्यांत आहेत, पण भविष्यात सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व "शाहू-कागल'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. 

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून येथील मेरी वेदर मैदानावर सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाची सांगता आज झाली. त्या वेळी कार्यक्रमात श्री. घाटगे बोलत होते. 

प्रदर्शनात 10 कोटींची उलाढाल झाली. महिला बचत गटांनी उभारलेल्या स्टॉलमधूनच सुमारे 20 ते 22 लाखांची उलाढाल झाल्याचे संयोजकांनी सांगितले. श्री. घाटगे म्हणाले, की 13 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. वर्षभरात जेवढी उलाढाल होत नाही, तेवढी या प्रदर्शनातून होत असेल तर अशा प्रदर्शनांची गरज आहे. "शाहू-कागल'चे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्यामार्फत कागल तालुक्‍यातील 100 शेतकरी दरवर्षी हरियानासारख्या राज्यात असे प्रदर्शन पाहण्यासाठी पाठविले जायचे. पण, श्री. महाडिक यांचे प्रदर्शन सुरू झाल्यापासून या शेतकऱ्यांनीच आता हरियानाला जायची गरज नसल्याचे (कै.) घाटगे यांनी सांगितले होते. 

धनंजय महाडिक म्हणाले, की हे प्रदर्शन अजून दोन दिवस वाढवण्याची मागणी होत आहे, त्याचा विचार पुढच्या वर्षी करू. या वेळी चांगला प्रतिसाद प्रदर्शनाला मिळाला. अनेक जातीवंत जनावरे पाहण्याची संधी मिळाली. या वेळी विविध स्पर्धांत क्रमांक मिळविलेल्या जनावरांच्या मालकांचा सत्कार झाला. कार्यक्रमाला अरुंधती महाडिक, डॉ. जे. पी. पाटील, डॉ. अजित शिंदे, रणजित कदम, डॉ. सुनील काटकर, कृष्णराज महाडिक आदी उपस्थित होते. पृथ्वीराज महाडिक यांनी आभार मानले. 

जाफराबादी रेडा पहिला 
प्रदर्शनातील "चॅम्पियन ऑफ दि शो' पुरस्कार हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील राजाराम शिवगोंडा गोरूले यांच्या जाफराबादी रेड्याला मिळाला. शिवण्या गणेश सावंत ( खटाव, ता. माण, जि. सातारा) यांच्या दोन फूट दोन इंच उंचीच्या पुंगनूर जातीच्या गायीलाही गौरवण्यात आले. किरण पांडूरंग संकपाळ व आयुष्य रघुनाथ पाटील ( मौजे सांगाव, ता. कागल) यांच्या खिलार बैलांना अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळाला. 
 

कागलच्या बैलांनाच पुरस्कार 
आजच्या कार्यक्रमात बऱ्याच लोकांना पुरस्कार मिळाला, योगायोगाने कागललाही दोन पुरस्कार मिळाले, त्यातही कागलच्या दोन बैलांनाच पुरस्कार मिळाला. कागलच्या बैलांनाच पुरस्कार मिळतात हे कौतुकास्पद आहे, असा टोला श्री. घाटगे यांनी लगावला. 

घाटगेंची सरकारवर टिका 
पाच वर्षापुर्वी सत्तेत असलेल्या सरकारने लोक कल्याणाच्या अनेक योजना सुरू केल्या. आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा ही त्यापैकीच एक योजना आहे. मराठा समाजातील मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ही योजना आणली. आताच्या शासनाने त्याला मात्र स्थगिती दिलेली नाही याचेही चांगले वाटते. त्याबद्दल या शासनाचे अभिनंदन करतो, अशा शब्दात श्री. घाटगे यांनी सरकारवर निशाणा साधला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com