शाळा एवढ्यात नकोच ! राज्यातील 80 टक्‍के पालकांचे मत...

Parents say should not start school early in karnataka state
Parents say should not start school early in karnataka state

बेळगाव - राज्यातील 80 टक्‍के पालकांनी शाळा लवकर सुरु करु नयेत असे मत मांडले आहे. तर फक्‍त 20 टक्‍के पालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शाळा वेळेत सुरु कराव्यात असा अभिप्राय दिला आहे. मात्र, शाळा सुरु करु नयेत असे म्हणणाऱ्या पालकांची संख्या अधिक असल्याने शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण खात्याला आता ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय तज्ज्ञ समितीच घेणार आहे.

  लस उपलब्ध झाल्यानंतर शाळा सुरु कराव्यात

कोरोनाच्या संकटामुळे शाळा कधी व कशा प्रकारे सुरु कराव्यात याबाबत शिक्षण खात्याने पालकांची मते मागवली होती. त्यानुसार पालकांनी आपली मते मांडली आहेत. कोरोनावर प्रभावी लस उपलब्ध झाल्यानंतर शाळा सुरु कराव्यात असे मत व्यक्‍त करणाऱ्या पालकांची संख्या अधिक आहे. त्यात शहरी पालक जास्त आहेत. लस सापडण्यापूर्वीच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तर मुलांना शाळेत पाठविणार नाही असे अनेकांनी म्हटले आहे. शाळा सुरु केल्यास सरकारने सर्व विद्यार्थ्यांना सॅनिटायजर्स व मास्क पुरवावेत, असे काही पालकांचे म्हणणे आहे. तर विद्यार्थ्यांना हातमोजे देण्यासह संपूर्ण परिसर निर्जंतूक करावा, अशी मागणी काहींनी केली आहे.

तर शिक्षण खात्याने घेतलेल्या बैठकांमध्ये कोरोना संकटकाळात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांची जबाबदारी सरकारने घ्यावी असे मत पालकांनी व्यक्‍त केले आहे. तसेच शाळा सुरु करताना पालकांना विश्‍वासात घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. राज्यातील 50 टक्‍क्‍यांहून अधिक पालकांनी दसरा सुट्टीनंतर शाळा भरविण्याचा सल्ला दिला आहे. तोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असेल असे पालकांना वाटते. यामुळे, शाळा सुरु करण्याचा निर्णय घेताना शिक्षण खात्याला सारासार विचार करावा लागणार आहे. शाळा कशा प्रकारे सुरु कराव्यात याचा निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ समितीची रचना करण्यात आली आहे. ही समिती सर्व पर्यांयाचा विचार करुन अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे, सद्यस्थिती पाहता शाळा लवकर सुरु होण्याची शक्‍यता धूसर आहे.

पालक म्हणतात....

  •  कोरोनावर लस सापडल्यानंतरच शाळा भरवा
  •  मुलांची जबाबदारी सरकारने घ्यावी
  •  मास्क, सॅनिटायजर्स, हातमोजे सरकारने द्यावेत
  •  शाळांचा परिसर निर्जंतुक हवा
  •  दसरा सुट्टीनंतरच शाळा भरवाव्यात


शाळांमध्ये पालकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल शिक्षण खात्याला पाठविण्यात आला आहे. पालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत काळजी आहे. त्यामुळे बहुतांश पालकांनी परीक्षा लवकर सुरु करु नये असे मत मांडले आहे. मात्र, सर्व गोष्टींचा विचार करुन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
- ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com