
गडहिंग्लज : तालुक्यात "कोरोना'चा एकही पॉझिटीव्ह रूग्ण नाही. त्यामुळे त्याची नागरिकांनी काळजी करू नये. परंतु, खबरदारी म्हणून स्वत: आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. विशेष करून पुणे, मुंबईसह देशातून आणि परदेशातून गावी आलेल्यांवर वॉच ठेवून त्यांची माहिती आरोग्य विभागाला कळवून त्याला आयसोलेट करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन तहसीलदार दिनेश पारगे यांनी आज केले.
"कोरोना' साथीच्या पार्श्वभूमीवर येथील तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी, सहायक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर, मंडल अधिकारी म्हाळसाकांत देसाई, प्रभारी एसटी आगारप्रमुख संयोजिता मनगुतकर यांच्यासह विविध विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
पारगे म्हणाले, ""तालुक्यात चीनहून एक आणि दुबईहून दोन जण आले असले तरी ते सर्वजण निगेटीव्ह आहेत. त्यांची पूर्णत: तपासणी झाली आहे. यामुळे काळजी करण्यासारखे काहीच नाही. अद्यापही कोरोनाची साथ गडहिंग्लजमध्ये दाखल झालेली नाही. परंतु ती भविष्यात येवू नये यासाठी लोकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना स्वत:हून अमलात आणण्याची गरज आहे. कोरोनाविषयी अफवाच अधिक आहेत. यापासून मृत्यूचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. इतर साथीच्या आजारातील मृत्यूच्या प्रमाणापेक्षा कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण फारच नगण्य आहे. यामुळे लोकांनी घाबरून जावू नये. फक्त स्वत:ची काळजी घ्यावी.''
डॉ. आंबोळे म्हणाले, ""उपजिल्हा रूग्णालयात कोरोना संशयीत रूग्णांसाठी स्वतंत्र चार बेडचे आयसोलेशन वॉर्ड सुरू केले आहे. कोरोनाची वैशिष्ट्ये आढळणाऱ्या रूग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली 14 दिवस येथे ठेवण्यात येईल. बाहेरून येणाऱ्यांनी घरातच पंधरा दिवस थांबावे. शाळेत सर्दी-खोकल्याचे विद्यार्थी असतील, तर त्यांना शाळेला न येण्याचे आवाहन करावे.'' डॉ. अथणी म्हणाले, ""प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याची शास्त्रीय पद्धतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी स्वतंत्र आरोग्य सेविकांची नेमणूक केली आहे.
शाळा परिसरात हात धुण्यासंदर्भात पोस्टरही लावलेत.'' गजगेश्वर यांनी ग्रामपंचायतीमध्ये कोरोनाची लक्षणे व घ्यावयाची काळजी या आशयाचे डिजीटल फलक लावण्याच्या सूचना देवू, असे सांगितले.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
- बाहेरून कोठूनही घरात आल्यानंतर हात धुवा
- ग्रामीण भागात पशूशी संपर्क असणाऱ्या लोकांनी वारंवार हात धुवावेत
- हस्तांदोलन न करता नमस्काराने स्वागत करा
- बाहेरचा प्रवास टाळा, सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळा
- मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन टाळावे
- घरातील मंडळींबरोबरच यात्रा साजरी करा
- महामंडळाने एसटींची स्वच्छता करावी
- शाळेतील स्वच्छतेत सातत्य ठेवा
- शाळांमध्ये आरोग्य विभागाने जनजागृती कार्यक्रम घ्यावेत
दर अर्ध्या तासाला पाणी प्या
डॉ. आंबोळे म्हणाले, ""नागरिक तहान लागल्याशिवाय पाणी पित नाहीत. परंतु, एखादी साथ आल्यास नागरिकांनी दर अर्ध्या तासाला थोडे-थोडे पाणी प्यावे. विषाणू हे विशेषत: नाक आणि घशाला प्रादुर्भाव करतात. नाक आणि तोंडावाटे गेलेले विषाणू पाणी पिल्यानंतर पोटात जातात. पोटात गेलेले विषाणू टिकत नाहीत. यामुळे अर्ध्या तासाला पाणी प्यावे. शाळेतही विद्यार्थ्यांना या सूचना द्याव्यात. या साध्या उपायांनीसुद्धा साथ आपल्याजवळ येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.