
गडहिंग्लज : "चित्री'चे पाणी निलजी बंधाऱ्याखाली वेळेत पोचले नाही म्हणून अज्ञात शेतकऱ्यांनी निलजी बंधाऱ्याचे दरवाजे काढले. ही शेतकऱ्यांची चूक आहे, हे मान्य असले तरी पाटबंधारे खाते तरी बरोबर आहे, हे कशावरून? बंधाऱ्यांमध्ये एक मीटर पाणीसाठा करून पाणी पुढे सोडण्याचा नियम पाटबंधारेचाच आहे. परंतु, काही बंधाऱ्यात दोन मीटरने पाणी का अडविले, याचे उत्तर मिळत नाही.
पूर्व भागातील शेती पिकांना पाणी मिळून 20 दिवस उलटले होते. पाण्याअभावी पिके धोक्यात येण्याची चिन्हे दिसत असतानाच अज्ञातांनी निलजी बंधाऱ्याचे दरवाजे परस्पर उघडले. शेतकऱ्यांची ही चूक आहेच. पाटबंधारे खात्याने प्रसिद्धीपत्रकातून, आमदार राजेश पाटील व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाने पाणी देण्यास पाटबंधारे सक्षम असताना काहींनी बंधाऱ्यातील दरवाजे खुले केल्याने सिंचन व्यवस्थापनात अडथळे येत असून, यापुढे असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. किंबहुना, बेकायदेशीर कृत्यावर कारवाई झाली पाहिजे, हे खरे असले तरी कारवाईचा इशारा देणाऱ्या केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक ठरते.
दरम्यान, "चित्री'चे लाभक्षेत्र निलजी बंधाऱ्यापर्यंत असले तरी या बंधाऱ्याच्या पूर्वेला तालुक्यातील गावे असल्याने त्यांनाही पाणी दिले जाते. निलजी बंधाऱ्याखाली पाणी गेल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच नदीपात्र रिकामे होते, हे वास्तव आहे. नदीपात्रात आधीचे भरपूर पाणी शिल्लक असल्याने 29 एप्रिलला हिरण्यकेशीत सोडलेले पाणी "निलजी'पर्यंत लवकर पोचणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. तालुक्यातील बंधाऱ्यांत एक मीटरने तर ऐनापूरच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यात दोन मीटरने पाणी अडविल्याचे शेतकरी आणि खात्याच्याच सूत्रांकडून सांगितले जाते.
परिणामी, "निलजी'पर्यंत 5 मेपर्यंत पोचणे शक्य असलेल्या पाण्याला 9 मेचा दिवस उजाडला तरी "निलजी'च्या पूर्वेला पुढे चाल मिळाली नव्हती. चित्री व यरंडोळ प्रकल्पातही अजून पाणी आहे. गरजेच्या वेळी पाणी का दिले जात नाही, हा सवालही शेतकऱ्यांचा आहे. डोळ्यांदेखत पिके धोक्यात असल्याचे न पाहावल्यानेच शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली असावी. शेतकरी व पाटबंधारे दोन्ही घटक आपापल्या जागी योग्य असले तरी समन्वयातून पाण्याचे नियोजन व वापर आवश्यक आहे.
""खोत बंधाऱ्यापर्यंत पाणी देण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने केले असताना परस्पर बरगे काढणे चुकीचे आहे. सर्वच बंधाऱ्यांतून एक मीटरने साठा करून पाणी सोडले आहे. नियोजित वेळेतच पाणी "निलजी'पर्यंत पोचले होते. आम्ही दरवाजे उघडणार होतो, इतक्यात अज्ञातांनी हा प्रकार केल्याने सिंचन नियोजनात अडथळा आला. यापुढे अशा प्रकारावर कारवाई करण्यात येईल.''
- तुषार पोवार, शाखा अभियंता, गडहिंग्लज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.