रब्बीसाठी उजनीतून सीनेत सोडले 11 टीएमसी पाणी ! शहराला दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

ujani-dam_201908278387.jpg
ujani-dam_201908278387.jpg

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रब्बी पिकांसाठी उजनीतून भीमा-सीना जोड कालव्याद्वारे सीनेत आज (मंगळवारी) पाणी सोडण्यात आले आहे. कालवा समितीच्या बैठकीत सोमवारी (ता. 18) त्याचा निर्णय झाला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून बोगद्यातून 150 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले असून त्यात वाढ करुन 900 क्‍युसेकने सोडण्याचे नियोजन आहे. डावा-उजवा कालव्यातून (कॅनॉल) सात टीएमसी, उपसा सिंचन योजनांमधून तीन टीएमसी व भीमा-सीना नदी बोगद्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.

शहरासाठी 27 जानेवारीपूर्वी औज बंधाऱ्यात पोहचणार पाणी 
उजनी धरणातील पाणी भीमा नदीद्वारे औज व चिंचपूर बंधाऱ्यात साडेचार मिटरपर्यंत पाणी साचेल, एवढे पाणी सोडावे असे पत्र महापालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिले आहे. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनीही तसे पत्र दिले आहे. सध्या औज बंधाऱ्यातील पाणीसाठा संपला असून चिंचपूर बंधाऱ्यात 1.20 मिटरपर्यंत पाणी आहे. तर टाकळी इन्टेक वेल (उपसा होऊन पाणी पडणारे ठिकाण) मध्ये साडेसात फुटांपर्यंत पाणी आहे. हे पाणी दहा दिवस पुरणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भीम नदीद्वारे उजनीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी 27 जानेवारीपूर्वी औज बंधाऱ्यात येईल, असे नियोजन केल्याचे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अधियंता धिरज साळे यांनी सांगितले.

रब्बीसाठी उजनीच्या कालव्यातूनदेखील पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. उद्या (बुधवारी) कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार आहे. रब्बीचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. यंदा परतीचा पाऊस समाधानकारक झाल्याने जिल्ह्यात रब्बीची पिके सध्या जोमात आहेत. उजनीतून कालव्यात तर बोगद्यातून सीना नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील रब्बी पिकांना मोठा लाभ होणार आहे. भीमा नदीतून एक हजार 500 क्‍युसेकच्या विसर्गाने पाणी सोडले असून टप्प्याटप्याने तो विसर्ग सहा हजार क्‍युसेक केला जाणार आहे. मागील वर्षीपासून उन्हाळ्यात दोन तर रब्बी हंगामात एक आवर्तन सोडले जात आहे. तो प्रयोग यशस्वी ठरल्याने आता त्यानुसारच नियोजन बदलण्यात आले आहे. उजनी धरण 100 टक्‍के भरलेले असून 55 टीएमसी पाणी आहे. उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com